Thursday 23 April 2015

शाळा

सध्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षांचे निकाल लागण्याचा मौसम सुरु आहे. ओळखीतल्या शाळकरी मुलांपैकी जवळपास सगळेच पहिल्या नंबरात पास होतायेत. मला प्रश्न पडलाय की सगळेच पहिल्या नंबरात असतील तर दुसरं कोण येतं? की दुसरा नंबर बादच केलाय शिक्षणपद्धतीतून ? शिवाय आजकाल  पहिल्या नंबरात येणाऱ्या मुलांचे फारसे कौतुक होत नाही. पहिल्या नंबरात आला तरी अमक्या विषयात मार्क जरा कमीच पडलेत अशी चर्चा जास्त होते. कारण त्या कमी मार्कांमुळे पहिला आणि दुसऱ्यातली तफावत कमी होते. या तफावतीमुळे काय फरक पडतो ते माहिती नाही.  कदाचित पालकांना 'अनबीटेबल लीड" हवी असावी असा माझा कयास आहे. अर्ध्या अर्ध्या मार्कांवरून पालकांचे शिक्षकांशी वाद होतात असं ऐकिवात आहे. असो. यावरून शिक्षणप्रवासातल्या काही गमतीजमती मला आठवल्या.
       शालेय जीवनात दहावा नंबर हा माझा बेस्ट परफ़ोर्मन्स होता. तोही फक्त एकदाच ! नाहीतर तेरा, सतरा, एकोणीस या नंबरांचा मी आवडता विद्यार्थी होतो. दुर्दैवाने हे नंबर माझ्या आवडीचे नसल्यामुळे यांचे पाढे मला आजही येत नाहीत! थोडक्यात वर्गातला येणारा नंबर हा माझ्या परफ़ोर्मन्स वर अवलंबून नसून इतरांच्या परफ़ोर्मन्स वर जास्त अवलंबून होता. तिथे अनबीटेबल लीड कायम ठेवण्याची जबाबदारी मी स्वत: वर घेतली होती. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे एकाच वयाच्या असलेल्या आम्हा तीन चुलत भावंडांमध्ये मी बहुतांश वेळा समोर असायचो. शिवाय वडिलांच्या आवडत्या गणित आणि इंग्रजीत मार्क बरे मिळत असल्यामुळे घरी कधी ओरडा बसला नाही. तसंही पाचवी ते सातवी दरम्यान आम्हाला असलेल्या इंग्रजी अभ्यासक्रमाचा दर्जा आत्ताच्या नर्सरीत असलेल्या दर्जापेक्षाही खालचा होता. इतिहास विषय माझ्या आवडीचा असला तरी नागरिकशास्त्रात बोंब होती. तेंव्हा त्या मार्कांचा इतिहास सांगण्यासारखा नाही. नागरिकशास्त्र विषय का शिकवतात असा प्रश्न नेहमी पडायचा. माझे आजोबा सांगायचे," अरे लोकशाहीत राहताना हे ज्ञान आवश्यक आहे बाबा. पुढेमागे निवडणूक वगैरे लढवलीस तर कामात येईल". मी निवडणूक अजून लढवलेली नाही पण नागरिकशास्त्राचा अभ्यास केलेला उमेदवार माझ्यातरी पाहण्यात आला नाही. भूगोलात विषुववृत्तीय प्रदेशाचा अभ्यास आवडायचा. बऱ्याचदा घराच्या गच्चीवर उभं राहून विषुववृत्त कुठे दिसते का हे मी शोधायचो. पण आपण विषुववृत्तामध्ये येत नाही हे कळल्यावर माझा उत्साह मावळला. विज्ञानातले बरेचशे शोध एकतर मला कळत नव्हते किंवा निरुपयोगी वाटायचे. म्हणूनच पुढच्या अभ्यासाचा त्रास वाचवण्यासाठी ,"अणूचे विभाजन होऊ शकत नाही" या महर्षी कणादांच्या थेयरीला माझा पाठींबा होता. भूमिती विषय जोपर्यन्त्त मला एखादी थेयरम (सिद्धांत) सिद्ध करायला कोणी सांगत नाही तोपर्यन्त्त आवडायचा. "मी थेयरम शोधली नाही, मी सिद्ध करणार नाही" असं उत्तर देण्याची त्यावेळी सोय नव्हती.( टिळकांचा तो बाणेदारपणा आणि आमचा तो उद्धटपणा ! या मानसिकतेचा मी जाहीर निषेध करायचो.) सगळ्यात आवडता विषय होता तो म्हणजे मराठी. पण त्यातसुद्धा व्याकरण नावाच्या राक्षसाने माझा फडशा पाडला. संस्कृतविषयी आदरयुक्त भीती वाटायची. हुशार विद्यार्थी संस्कृतला स्कोअरिंग वगैरे म्हणायचे पण अश्या मित्रांची वाईट संगत मी नेहमीच टाळली. 
        चौथीत असतानाची गोष्ट. वार्षिक उत्सवानिमित्त एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्याचे ठरले. प्रत्येक वर्गातील काही हुशार विद्यार्थी निवडले गेले. त्यामुळे त्यात माझा समावेश असण्याचा प्रश्नच नव्हता. पण माझ्यासारख्या  इतर विद्यार्थांचा सहभाग वाढावा यासाठी प्रमुख स्पर्धेआधी एक अनौपचारिक स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेत मी दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली हे आमच्या वर्गशिक्षिकेच्या लक्षात आले. त्यांनी मला प्रमुख स्पर्धेच्या संघात घेतले. त्यानंतर स्पर्धेत मी जो काही परफ़ोर्मन्स दिला त्याला तोड नाही. प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपापसात चर्चा करून मग उत्तर द्या अशी स्पष्ट सूचना आम्हाला दिली होती. पण चर्चा करून प्रश्न सुटतात एवढे प्रगल्भ विचार त्यावेळी मी करत नव्हतो.
पहिला प्रश्न : ग्रीष्म ऋतूनंतर कोणता ऋतू येतो ?
क्षणाचाही उशीर न करता मी समोरचा माईक उचलला आणि सांगितलं : पावसाळा !
सगळ्या मित्रांनी रागाने माझ्याकडे बघितलं.
दुसरा प्रश्न : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान  कोण ?
माझा मित्र उत्तर देणार तेव्हढ्यात त्याच्या हातातून माईक हिसकून मी उत्तर दिलं : नरसिंह राव !
यावेळी मी शंभर टक्के बरोबर आहे असा मला विश्वास होता. कारण त्यावेळी तेच पंतप्रधान होते. आणि त्याचं वय बघून स्वातंत्र्य मिळाल्यापासून हेच पंतप्रधान असतील असं वाटणं साहजिक होतं ! पण माझं उत्तर चुकलं होतं. आता मित्रांनी  माझ्याजवळचा  माईक उचलून पलीकडल्या कोपऱ्यात ठेवला.
तिसरा प्रश्न : स्व. राजीव गांधी यांच्या आईचे नाव काय ?
मला उत्तर येत होते. पण माझ्याजवळ माईक नव्हता म्हणून मी फक्त हात वरती केला. त्या सूत्रसंचालकांनी माझ्या जवळ येउन त्यांचा माईक मला दिला.
मी उत्तर दिलं : सोनिया गांधी !
ते सूत्रसंचालक सर जागच्या जागी हादरले. आणि पूर्ण हॉलमध्ये हास्याचा गडगडाट झाला !
        परीक्षेच्या काळात तर आणखी मजा यायची. भूगोलाच्या पेपरमध्ये नकाशावाचनाचा प्रश्न असायचा. एकदा  नकाशात अरबी समुद्र कुठे आहे हे दाखवायचे होते. अरबी समुद्र पश्चिम दिशेकडे आहे हे मला पक्कं ठाऊक होतं. पण अमरावतीकडून पश्चिमेकडे बघताना माझी मजल जास्तीत जास्त मराठवाड्यापर्यन्त गेली. आणि तिथेच मी अरबी समुद्र दाखवला ! या भौगोलिक पराक्रमाबद्दल आमच्या वर्गशिक्षिकेने पूर्ण वर्गासमोर माझा सत्कार केला होता. अरबी समुद्राचं मराठवाड्यातला स्थान मान्य केला असतं तर आज तिथे दुष्काळाची परिस्थिती नसती. पण एवढी दूरदृष्टी आमच्या शिक्षकांकडे नव्हती ! विज्ञानाच्या पेपर मध्ये एकदा "चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या दिवशीच का होते ?" असा प्रश्न विचारला होता. त्यावर एका मित्राने लिहिले," पौर्णिमेच्या  रात्री भरपूर प्रकाश असल्यामुळे पृथ्वीला चंद्र लवकर सापडतो आणि ग्रहण सुरु होते !".दुसऱ्या एका मित्राने तर कहर केला होता. वजाबाकी करताना लहान आकड्यातून  मोठा आकडा  वजा करायचा असेल तर बाजूच्या आकड्यातून दशक उसनं घ्यावं असा नियम आहे. (उदा. ६२-५८ , दोनातून आठ वजा करताना दशक  उसनं घेऊन बारातून आठ वजा करणे) तो उसनं घ्यायच्या भानगडीत न पडता ,दोनातून आठ वजा होत नसतील तर आठातून दोन वजा करायचा !    
       शाळेच्या आठवणी लिहिताना एक व्यक्ती मला राहून राहून आठवते. त्यांच्या उल्लेखाशिवाय हे लेखन पूर्ण होऊच शकत नाही. सहावीत असताना गणितातल्या x (एक्स) नावाच्या सतत बेपत्ता असलेल्या मुलाशी ओळख झाली. बरं त्याला शोधायला जावं तर तो कायम अपूर्णांकातच सापडायचा.  x =१०० असं उत्तर कधी आलंच नाही. ह्या एक्सला शोधता शोधता नववीत गेल्यावर एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्व गुरु म्हणून  गवसलं. दुर्गे सर ! आपल्या पेश्याविषयी त्यांच्याएवढी तन्मयता असलेला शिक्षक मी पाहिलेला नाही. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच हे माझ्यासहित त्यांचे सगळे विद्यार्थी मान्य करतील. आमच्यातला "एक्स" शोधायला त्यांनीच आम्हाला दिशा दाखवली. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा एक संदेश नकळतपणे आम्हाला दिला.
"एक्सला जरूर शोधा, पण सापडला म्हणून थांबू नका. कारण ज्याक्षणी एक्स सापडेल त्याक्षणी तुमचे शिक्षण संपेल. आणि पर्यायाने तुम्हीसुद्धा !!"
-- चिनार                               

2 comments:

  1. चिनारजी, तुमची मेल पाहिली आणि तुमच्या ब्लॉगला भेट दिली. छान लिहिताय. शाळा आवडलीऽअपन आपला ब्लॉग रिमझिम पाऊसला जोडावा. आपला ब्लॉग रिमझिम पाऊस च्या डाव्या बाजुला दिसू लागेल. त्यामुळे माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या वाचकांच्या नजरेत आपला ब्लॉग येईल

    ReplyDelete