Wednesday 8 April 2015

गोष्टी एकेकाच्या!

      बढाया मारणे, समोरच्याला कमी लेखणे हा मानवी स्वभावाचा भाग आहे. पण हे करत असताना बऱ्याच वेळा लोकं भानंच ठेवत नाही. मला याविषयी आलेले काही अनुभव खाली मांडतो आहे.
      वधु संशोधनाचे दिवस होते त्यावेळेची गोष्ट. नागपूरला 'पाहण्याचा' कार्यक्रम ठरला. त्यांच्या घरी गेल्यावर चहापाणी झाले. मोठ्यांच्या गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात साधारण चाळीशीत असणारे मुलीचे काका आले. ते रेल्वे  मध्ये कुठल्याश्या विभागात क्लरीकलला होते. ओळख झाल्यावर त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरवात केली.
"तुमचं इंजिनीरिंग कुठल्या विषयात झालंय ?"
"मेकॅनिकल!”(मनात: बायोडाटा बघितला नाही का बे?)
"अरे वा! कुठल्या कंपनीत काम करता?”
"क्ष कंपनीत"
"कधी नाव ऐकलं नाही. नवीन आहे का?”
"नाही. ३५ वर्ष जुनी आहे."
"अच्छा! तसा मी १९८४ चा डिप्लोमा होल्डर आहे मेकॅनिकल! मला ही इंडस्ट्री चांगलीच माहिती आहे. हे नाव पहिल्यांदाच ऐकलं”
"तुम्ही कोणत्या कंपनीत होतात?”
"नाही नाही ! मी पहिलेपासून रेल्वेतच आहे."
च्यामारी! आम्ही सहा -सात वर्षापासून घासतोय तरी या इंडस्ट्रीचा आवाका अजून कळेना अन ह्याला डिप्लोमा घेऊन अख्खी इंडस्ट्री कळली!
     
       एकदा कंपनीत चर्चा सुरु होती. आमचे एक अत्यंत अनुभवी वरिष्ठ (ईलेकट्रीकल इंजीनियर), साईटवरचे अनुभव सांगत होते. आम्ही सगळे भक्तीभावानी ऐकत होतो.
"अरे रात्रभर त्या ट्रान्सफॉर्मर चे ईरेकशन सुरु होतं. २५००० KVA चा होता तो......"
तेवढ्यात एक नुकताच साईट वरून आलेला मॅनेजर पचकला.
"काहीही नका सांगू हो. ट्रान्सफॉर्मर लावणं एवढं कठीण असतं होय? आम्ही तर असं हातांनी झेलत झेलत लावायचो ट्रान्सफॉर्मर !"
ते वरिष्ठ एकदम स्तब्ध झाले. आणि शांतपणे म्हणाले.
"ट्रान्सफॉर्मर डिझायनिंगचं पुस्तकसुद्धा असं हातात झेलता येत नाही. तू ट्रान्सफॉर्मर लावला की खोलीतला टेबलफॅन?”

         एकदा घरी एक ओळखीतले गृहस्थ आले होते. त्यावेळी नुकतंच कपिल देव ला "विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ सेन्चुरी" हा पुरस्कार घोषित झाला होता. त्या गृहस्थांच आणि कपिल देवचं काय वाकडं होतं कोणास ठाऊक पण या घटनेवर झालेली चर्चा खालील प्रमाणे
" अत्यंत चुकीचा निर्णय आहे हा ?"
"का हो ? असं का म्हणताय ?"
"कपिल देव ची लायकीच नाहीये !"
(अरे बापरे...माझ्या एका श्रद्धास्थानाला धक्का पोहोचला होता!)
"असं तुम्हाला वाटतं!"
"मी सुद्धा क्रिकेट खेळलोय म्हटलं..महाराष्ट्राच्या रणजी टीम मध्ये होतो. कपिल देव आयुष्यभर खेळला  ते फक्त एका मॅचच्या भरवश्यावर.. ती पण झिम्बाब्वे विरुद्ध ..१७५ काढले होते"
"म्हणजे त्याआधी आणि त्यानंतर, तो कधीच चांगला खेळला नाही???”
"नाही..!!"
"तुम्ही किती वर्ष खेळला महाराष्ट्राकडून?"
"एक सीझन खेळलोय. त्यातही एका मॅचमध्ये  प्लेयिंग एलेव्हन मध्ये होतो"
देवां.....ज्या मॅचच्या भरवश्यावर कपिल देव  आयुष्यभर खेळला असं म्हणतायेत त्यात तो कॅप्टन होता हो...आणि वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळी आपण ! आणि हे एका सीझन च्या भरवश्यावर विस्डेन च्या ज्युरींना अक्कल शिकवतायेत !

      कंपनीतल्या एकाने तर कहर केला होता. शाळेत असताना ते हॉकी खेळायचे म्हणे. आणि कर्मधर्मसंयोगाने धनराज पिल्ले त्यांचा वर्गमित्र होता. (खरं - खोटं माहिती नाही!) एकदा ते म्हणाले
" हा धन्या खरंच नशीबवान निघाला"
"का हो ?"
"अरे आम्ही सोबत खेळायचो. मी कॅप्टन होतो शाळेचा"
"बरं मग ?"
"अरे दहावी पास झालो.. नंतर माझी हॉकी सुटली. आणि हा खेळत राहिला. अभ्यासाच्या नावाने बोंब होती त्याची. झाला भारताच्या टीममध्ये सिलेक्ट "
" अहो पण नशिबाचा काय संबध ? कॅलिबर होतं त्याचं तेवढं"
"कसलं कॅलिबर डोंबल?? मी खेळणं थांबवलं आणि हा सिलेक्ट झाला !!" 

      एका मित्राला शेयर मार्केटविषयी बोलायला फार आवडायचं. वॉरेन बफेटनंतर मार्केट त्यालाच कळलंय अश्या आविर्भावात तो बोलायचा.
"तुला सांगतो.. मार्केट उगाच खाली-वर जात नाही. त्याला १०० नियम आहेत. मी अभ्यास केलाय त्याचा. बघ तू... पुढचे वर्ष मार्केट वरच जाणार"
त्यानंतर काही दिवसातच मार्केट बदाबदा खाली पडलं.
"अरे असं होतं कधीकधी..१० पैकी वेळा मार्केट नियम पाळते.. वेळा पाळत नाही"
"त्या वेळा कश्या ओळखायच्या?"
"एवढं सोप्प नाहीये...अभ्यास करावा लागतो... मी अभ्यास केलाय त्याचा!!!"

            एका मित्राला बढाया मारण्याची सवयच जडली होती. कोणताही विषय काढला की तो सुरु व्हायचा. बोलण्याचा सूर साधारण असा असायचा ," माझे एक काका US ला आहेत ..वगैरे वगैरे..." त्याचे काका किंवा मामा जगातल्या सगळ्याचं देशांमध्ये होते. ते कमी पडलेच तर दादा आणि ताई तर अगणित होत्या. एकदा असंच कोणत्यातरी विषयावर चर्चा सुरु होती. तो घाईघाईने म्हणाला.
"चल मी निघतो."
"अरे कुठे चालला एव्हढ्यात."
"अरे मला दादाकडे जायचंय."
(एवढी चांगली संधी मी कशी सोडणार !)
"अरे थांब ...संध्याकाळी US साठी कोणतीच फ्लाईट नाहीये !!! "

      असे कितीतरी महाभाग दैनंदिन आयुष्यात भेटतात. कधी रेल्वे किंवा बस प्रवासात आपल्या सह्प्रवाश्याशी बोलून बघा. वास्तविक प्रवासात होणारी चर्चेचा उद्देश फक्त टाईमपास हाच असतो.तिथे झालेली ओळख ही तेवढ्या वेळापुरती असते. पण बढाईखोर अश्या संधीची वाटच पाहत असतात. एकदा माझ्या शेजारी बसलेले काका, त्यांना रेल्वे प्रवासाचा कसा दांडगा अनुभव आहे हे सांगत होते.
"अरे मी जेवढे दिवस घरात राहिलो असेल त्याहून जास्त दिवस रेल्वे प्रवासात राहिलोय"
"हो का ! अरे वा"
" हा रुट तर माझ्यासाठी रोजचाच आहे...सगळ्या गाड्यांच्या वेळा माहितीयेत मला"
"अच्छा"
त्यांना खरोखरच गाड्यांची माहिती असावी. पण त्यांना ते सिद्ध करून दाखवायचंच होतं. पूर्ण प्रवासात आम्हाला क्रॉस झालेल्या प्रत्येक ट्रेनचं नाव त्यांनी मला सांगितलं (एकतर या बहुमुल्य माहितीचा मला काहीही उपयोग नव्हता आणि त्यांनी कोणतंही नाव सांगितलं तरी हो म्हणण्यावाचून पर्याय नव्हता.).पण एका कुठल्यातरी ट्रेनचं नाव त्यांना काही केल्या आठवत नव्हतं. ती ट्रेन आम्हाला तेंव्हा क्रॉस होत होती.
"अरे मी गेलोय रे या गाडीनी...नाव आठवत नाहीये खरं!"
"जाऊद्या काका"
"अरे असं कसं? माहितीये ना मला"
"अहो मग आठवत नसेल तर उतरून विचारून या ना", मी नकळतपणे बोलून गेलो.
ते काका थोडावेळ शांत बसले. पण त्यांना काही राहवेना.
"रेल्वे बजेट पार हुकलय बघ यावेळी"
"का? काय झालं?"
"अरे नुकसानीत चाललीये रेल्वे..थोडी भाववाढ करायला हवी होती."
"नुकसान?"
"मग काय ? तुमच्या प्राह्यव्हेट कंपन्यानसारखा खोऱ्यानी पैसा नाही ओढत रेल्वे..हेच कळत नाही ना तुम्हाला...अरे तुम्ही लोकं............................"
काका मगाचा बदला घेणार हे माझ्या लक्षात आले.
"सगळं मान्य आहे काका! पण प्राह्यव्हेट कंपन्यानसारखा इन्कम टॅक्स भरावा लागतो का रेल्वेला? बारा महिने तेजीत चालणारा दुसरा कुठला धंदा पाहिलाय तुम्ही? बरं ते जाऊद्या..कोणत्या धंद्यात ६० दिवसाआधी १०० टक्के पेमेण्ट मिळते ? वारंवार वाईट अनुभव येऊनही कस्टमर परत प्रवास करायला येतात असं दुसऱ्या कोणत्या धंद्यात होतं?
काका नंतर पूर्ण प्रवासात शांत होते !


-- चिनार

No comments:

Post a Comment