Tuesday, 26 May 2020

तिचा काहीच दोष नसतो..

शाळेचे दिवस. आठवी-नववीत असेल. "ती तुझ्याकडेच बघते रे" असे शपथेवर सांगणारे मित्र भरपूर होते. नालायकांनी अश्या शपथा घेऊन कितीवेळा स्वतःच्याच  म्हातारीचा जीव धोक्यात घातलाय त्याला गणतीच नाही. एक मित्र तर काहीही झालं की गजानन महाराजांची शपथ घ्यायचा. पण ती माझ्याकडे बघायची हे खरं होतं.कारण मी खिडकीजवळ बसायचो. मग खिडकीबाहेर बघण्यासाठी तिला माझ्या दिशेने बघण्याशिवाय पर्याय नव्हता! आता मित्रांनी त्याचे भलते अर्थ काढले ह्यात तिचा आणि गजानन महाराजांचा काहीच दोष नव्हता.

आणि ऍक्च्युअली, तिचा कधीच दोष नसतो!

तिचा शाळेला,ट्युशनला वगैरे येण्याजाण्याचा रस्ता ठरलेला होता. आता मधात माझं घर होतं त्याला ती करणार? पण "ती मुद्दाम तुया घरासमोरून जाते ना बे" हे मित्रांच मत. मग तिच्या येण्याजण्याच्या वेळी आमचं अंगणात चकरा मारणं ठरलेलं. मग एक दिवस घोळ होतो. तिच्या येण्याची अन मी समोरच्या गटारातून बॉल काढून, आंगभर शिंतोडे घेऊन, जग जिंकल्याच्या आविर्भावात फाटकाकडे येण्याची एकचं वेळ होते. आमचा अवतार बघून तिच्या मैत्रिणी हसतात. ह्यात तिचा काय दोष!

खरं सांगतो, तिचा काहीच दोष नसतो...

आता ताप काय कोणाला येत नाही का? तिलाही आला.डॉक्टरकडे गेली बिचारी. बरीच गर्दी होती. आतमध्ये कोणाचातरी ओरडण्याचा आवाज आला. दोनच मिनिटांनी कमरेवर हात ठेवून केबिनमधून मी बाहेर पडलो. ती तरी काय करणार?

तिचा काही म्हणजे काहीच दोष नसतो...

आता मी काही एवढा ढ वगैरे नव्हतो. पण एकदा गणिताच्या मॅडम चाचणी परीक्षेचे मार्क वर्गात सांगत होत्या. आमच्यातल्याच एका भैताडाने त्याच्या पेपरवर माझा रोलनंबर लिहिला होता. त्याला विसपैकी तीन मार्क मिळाले. मॅडमनी वर्गासमोर अन तिच्यासमोर माझा जाहीर सत्कार केला. दुसऱ्यादिवशी मॅडमला चूक लक्षात आली. त्यांनी वर्गासमोर ती मान्य केली. पण त्यादिवशी नेमकी ती आली नव्हती! आता घरी पाहुणे आले त्याला ती काय करणार...?

तिचा कधीच दोष नसतो..

तिचा भाऊ आमचा शाळेत नव्हता. पण भावाची "ती" आमच्या शाळेत होती. तो वरचेवर चक्कर टाकायचा. एकदा सायकल पार्किंग वरून झाले आमच्यात भांडणं. शाळा आमची होती त्यामुळे आम्ही शेर. धुतला त्याला सगळ्यांनी उभाआडवा. मी त्याची कॉलर पकडलेली. तेवढयात ती समोर आली. तिची बिचारीची काय चूक?

तिची कधीच चूक नसते...

ती वर्गाची कॅप्टन बनते. वर्गात दंगा होऊ नये ही तिची जबाबदारी असते. केवळ तिच्यासाठी मी शस्त्र खाली ठेवलेले असतात. पण एक दिवस...!

एक दिवस मागच्या बेंचवरच्या मुलाला शांत बसवण्यासाठी मी ओरडलेलो असतो. माझी काहीच चूक नाही हे तिलाही माहिती असते. पण राजधर्म!!! केवळ राजधर्म म्हणून माझे नाव ती फळ्यावर लिहिते.

तिचा काहीच दोष नसतो...

परत मित्र म्हणतात,

"अबे तिला तुझं नाव तिच्या हाताने लिहायचं होतं म्हणुन लिहीलंय. बघ किती सुंदर लिहीलंय"

आम्हाला लय गोड वाटतं

आता तिचं अक्षर मुळातच सुंदर असतं..त्यात तिची काय चूक..

तिचा काहीच दोष नसतो...

खरं सांगतो, तिचा काहीच दोष नसतो..

समाप्त





Tuesday, 28 April 2020

सिनेमातले विनोदी प्रसंग..

परवा प्रियदर्शनचा खट्टामीठा सुरु होता. नेमका तो रोड रोलर नेण्याचा प्रसंग बघण्यात आला. हा एक अफाट  विनोदी सीन आहे.

प्रचंड नुकसानीत असलेला कंगाल कॉन्ट्रॅक्टर सचिन टिचकुले (अक्षय कुमार) नगरपालिकेविरोधात एक कोर्टकेस जिंकतो. आणि नुकसानभरपाई म्हणून त्याला पालिकेच्या मालकीचा रोड रोलर मिळतो. पण तो रोड रोलर नादुरुस्त आहे हे टिचकुलेला माहिती नसतं. रोलर चालवण्यासाठी स्पेशालिस्ट ड्रायव्हर जॉनी लिव्हरला बोलावण्यात येते. आणि रोडरोलर पुराण सुरु होते. जॉनी लिव्हरने टिपिकल ड्रायव्हरच्या भूमिकेचं बेयरिंग अचूक पकडलं आहे. रोलर सुरु होत नाही हे पाहून,"अभी मेरेको समझ में आया इसका प्रॉब्लेम क्या है" असं दर दोन मिनिटांनी जॉनी म्हणत असतो. शेवटी पूर्ण इंजिन,गियरबॉक्स उघडूनही रोलर चालू होत नाही हे पाहून तो हत्तीच्या साहाय्याने ओढण्यात येतो. मग एका चढाईच्या रस्त्यावर दोर तुटून रोलर खाली घसरायला लागतो. कोपऱ्यावर असलेल्या नीरज व्होराच्या घराची भिंत तोडून रोलर पार लिविंग रूमपर्यंत पोहोचतो. काहींच्या काही आहे हा सीन पण दरवेळी बघताना मी पोट धरून हसतो.

विनोदी पंच नसलेले असे सिचुएशनल कॉमेडी सिन लिहिणं आणि पडद्यावर साकारणं अवघडच असतं. इथं स्क्रीनप्ले, कॅमेरा अँगल आणि कलाकारांचे एक्प्रेशन्स फार महत्त्वाचे असतात. ह्या प्रसंगात फुकाचा ऍटिट्यूड असेलला ड्रायव्हर,सतत पैसे खर्च करून काहीच हाती न लागल्याने फस्ट्रेट झालेला कॉन्ट्रॅक्टर , कॉट्रॅक्टरला शांत करून काही ना काही उरफाट्या आयडीया देणारा नोकर आणि ह्या सगळ्याशी काहीच संबंध नसताना उगाचच ह्यात गुरफटला गेलेला कोपऱ्यावरचा घरमालक ह्या चारही भूमिका अनुक्रमे जॉनी लिव्हर, अक्षय कुमार,राजपाल यादव अन नीरज व्होरा ह्यांनी फारच अफलातून केल्या आहेत.

या सगळ्यावर कडी म्हणजे प्रसंगातली शेवटची फ्रेम,

रोलरवर बसून घराची भिंत तोडून लिविंग रूममध्ये टीव्हीजवळ पोहोचल्यावर जॉनी म्हणतो,

"जरा स्पीड से अगर और आते ना, हमलोग वो रोड पे पहुचते थे...आई शप्पथ !"

प्रियदर्शनच्या सिनेमात असे प्रसंग बरेचदा पाहायला मिळतात. ह्याच सिनेमात पुढे सचिन टिचकुले बहिणीच्या लग्नासाठी म्हणून उधार मागायला एका हार्डवेयर शॉपच्या मालकाकडे (असरानी) जातो. तिथं दुकानातलाच एक कर्मचारी अतुल परचुरेसुद्धा आईच्या इलाजासाठी  मालकाकडे पैसे मागायला आला असतो. त्याचवेळी असरानीला  बायकोचा आणि ग्राहकाचा फोन एकाच वेळी आला असतो. चौघांशी बोलताना त्याला कन्फ्युजन होते. हा थोडासा ब्लॅक कॉमेडी प्रकारात येणार प्रसंगही मस्त जमला आहे.

 प्रियदर्शनच्याच 'हंगामा' सिनेमात आणखी एक अफलातून प्रसंग आहे. वेडा समजून राजपाल यादवला पकडायला पोलीस इन्स्पेकटर (मनोज जोशी) एका लॉजमध्ये येतात आणि आरडाओरडा चालू करतात. आणि ह्या सगळ्या प्रकारावर चिडलेला राजपाल पोलीस, लॉजचा नोकर, लॉजचा मालक अश्या सगळयांना धोपटून काढतो.

दुल्हेराजा सिनेमाचा शेवटचा प्लॉट, हा शाब्दिक आणि सिच्युएशनल अश्या दोन्ही विनोदी प्रकारात मोडणारा एक आयकॉनिक सीन आहे. गोविंदा काय प्रतीचा कलाकार आहे ते ह्या प्रसंगात दिसते.

संजीव कुमारजी आणि देवेन वर्मा सर ह्यांचा अंगुर सिनेमा म्हणजे तर विनोदी लेखनाची कार्यशाळा आहे. खूप वैतागलेला संजीव कुमार पोलीस स्टेशनला जाण्यासाठी एका ऑटोवाल्याला पत्ता विचारतो,
"अरे ये पुलीस स्टेशन कहा है?"

"साहब, पुलीस स्टेशन...छोटा या बडा?"

ह्यावर आणखी वैतागून संजीव कुमार म्हणतो,

"मुझे खरीदना नही है! कंपलेंट लिखानी है भाई!"

ही विनोदाची सर्वोच्च पातळी आहे! इथला रस्ता सापडला पाहिजे!

विनोदात लेयर्ड विनोद नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे वेगवेगळे थर (लेयर) असलेला विनोद. तो ह्या प्रसंगात आहे. म्हणजे बघा, कोणीतरी पत्ता विचारल्यावर सरळ न सांगता आगाऊपणे प्रतिप्रश्न करणं (छोटा या बडा?) हा पहिला थर. नंतर संजीव कुमारच हे पात्र आधीच्या घटनांमुळे खूप वैतागलेलं असतं. त्यात हा प्रतिप्रश्न ऐकून तो आणखी चिडतो. संजीवजी ज्या पद्धतीने,"मुझे खरीदना नही है" हे वाक्य डिलिव्हर करतात त्यात त्या पात्राचं अक्ख्या कथेतलं फस्ट्रेशन विनोदी पद्धतीनं बाहेर येते. हा विनोदाचा दुसरा थर. अर्थात हे करायला त्या तोडीचा अभिनेता असावा लागतो. आणि शेवटचा थर म्हणजे, नेमकं पोलिसांच्याच संदर्भात वापरलेलं,"मुझे खरीदना नही है" हे रूपक !!

विनोदी प्रसंग हा माझा आवडीचा विषय आहे. रडवण्यापेक्षा हसवणं हे फार कठीण असतं.

तुम्हाला आवडणारे विनोदी प्रसंग जरूर लिहा.

मुंग्या..


आजकाल टीव्हीवरती मुंग्या येत नसल्याने रामायण-महाभारतामुळे अपेक्षित असलेला नॉस्टॅल्जीक फील म्हणावा तसा येत नाहीये. हल्ली जसं टीव्हीवर काही नसलं तरी सूर्यवंशम असतो तसं त्याकाळी मुंग्या असायच्या. या मुंग्या बऱ्याचदा एखादा कार्यक्रम सुरु असतानासुद्धा यायच्या. सिनेमा रंगात आला असताना म्हणजे हिरोच्या आईला किंवा हिरोईनला व्हीलेनच्या आदमींनी नुकतंच पकडून नेलंय. आणि हिरोला आत्ताच ही बातमी शेजाऱ्याकडून मिळालीये. आणि हिरो माँ कसम वगैरे म्हणून फायटिंग मोड ऑन करून व्हीलेनच्या अड्ड्यावर पोहोचणार तेवढ्यात टीव्हीवर मुंग्यांचं आगमन व्हायचं. मग घरातल्या पोरांना शेजारच्या घरी पाठवून तिकडेही मुंग्या पोहोचल्यात का हे बघितल्या जायचं. त्यावरून प्रॉब्लेम वैश्विक आहे की घरगुती आहे हे निश्चित व्हायचं. वैश्विक असल्यास तो पाच-दहा मिनिटात आपोआप सुटायचा अन मुंग्या आपापल्या घरी जायच्या.

पण घरगुती असल्यास युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु व्हायचे. घरातले तज्ञ म्हणजे बाबा किंवा दादा, टीव्हीच्या मागची दूरदर्शनची केबल उगाचच काढून आणि सॉकेटमध्ये फुंकर घालून परत खोचून बघायचे. ही फुंकर टेक्नॉलॉजी कधीच कामात येत नव्हती. मग तांत्रिक प्रयत्नांचा कळस म्हणजे टीव्ही बंद करून एकदा परत सुरु करणे. त्यानंतर छतावरच्या अँटेनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं निदान व्हायचं. अनुभवी बायका अश्यावेळी "आता ह्यांच्या बापाकडून काही टीव्ही चालू होत नाही. संपला मेला पिच्चर" असं मनातल्या मनात बडबडत स्वयंपाकाला लागायच्या.

मग शेजारच्या दादाला जो आयटीआय शिकतोय छतावर चढून अँटेना हलवण्यासाठी पाचारण केल्या जायचं. आमच्या घराला जिना नव्हता अन शिडी लहान होती. त्यामुळे शिडीने मोरीच्या छतावर चढायचं अन शिडी वर ओढून घराच्या छतावर चढायचं इतका द्राविडी प्राणायाम होता. नंतर बराच वेळ तो दादा अँटेनासोबत झटापट करायचा. म्हणजे अँटेना पूर्ण ३६० अंशात वळवून देखील फरक पडत नव्हता. एव्हाना त्या दादाचे वडील सुद्धा आमच्या अंगणात आलेले असायचे. त्यांनी स्वतः मुंबईला जाऊन दूरदर्शन केंद्र एकदा लांबून बघितले असल्याने त्यांना तगडा अनुभव होता.

शेवटी वरतून दादा ओरडायचा,
"नाही होत आहे हे इथून?"

ह्यावर काका त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा एक सुस्कारा टाकून म्हणायचे,
"मी म्हनलं ना जोशीसाहेब तुमाले.... तिकडूनचं प्रॉब्लेम हाये काहीतरी !"

तिकडून म्हणजे कुकडून ? हे विचारण्याची आम्हाला परवानगी नव्हती.

इंजिनियरिंग करूनही घरातल्या टीव्हीवरच्या मुंग्या कुकडून यायच्या आणि कुकडे जायच्या हे आजवर मला उलगडलेलं नाही.  


Thursday, 9 January 2020

मन्या व्हर्सेस अंबानी..


आमच्या मन्यानी नवीन वर्षाचा संकल्प वगैरे करणं कधीच सोडलं आहे. वारंवार संकल्प करून तो पूर्ण करणं, मग त्याची लाज वाटणं,मग स्वतःला दोष देणं आणि ह्यातून हळूहळू निगरगट्ट होण्याकडे झुकणं अन फायनली निगरगट्ट होणं ह्या सगळ्या स्टेजेस मन्याने पार केल्या आहेत. आता त्याच्यासमोर कोणी न्यू इयर रिझोल्युशन वगैरे गोष्टी सुरु केल्या की मन्या मनातल्या मनात हसतो. तरीसुद्धा खूप वर्षांपासून मनात असलेला पण कधीही पूर्णत्वास गेलेला, सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे लवकर उठण्याचा निर्णय यंदा मन्याने घेतला होता. फक्त ह्यावेळी त्याने त्याला  संकल्प वगैरे नाव देऊन जाहिरात करणं कटाक्षाने टाळलं.आता जानेवारीचा पहिला आठवडा संपत आला तरी मन्या रोजच्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशीराच उठतोय. कारण थंडीचं तशी पडलीये ना !  पण काल शनिवारी रात्री मन्याने ठरवलं की काहीही झालं तरी उद्या सकाळी लवकर उठायचंच..

आणि सकाळी सव्वा आठ वाजता मन्याचा डोळा उघडला..!

स्वयंपाकघरात गेल्यावर मिश्किल हास्याने बायकोने त्याचे स्वागत केले. नऊ वाजता मन्या चहा पिता पिता पेपर वाचत होता. तिकडून बायकोने घरात काहीही भाजी नसल्याचे जाहीर केले.आणि मन्याला संभाव्य संकटाची चाहूल लागली. त्याने लगेच "मी आणतोय" अशी घोषणा केली. आणि लेकीला सोबत घेऊन तो निघाला सुद्धा. तसं भाजी आणणं हे मन्याचं आवडतं काम. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून त्याच्या घराजवळची मंडई बंद पडली होती. त्यामुळे मन्याला जवळच्या रिलायन्स फ्रेश मधून भाजी आणावी लागायची. तिथं जाणं मन्याला अजिबात आवडत नाही. सुपरमार्केट,शॉपिंग मॉल इथे मन्या गुदमरतो. इथला प्रत्येक माणूस आपल्याला लुटायलाच बसलाय ही त्याची धारणा आहे. नेहमीचा भाजीवाला एक किलो मटार मोजल्यावर दोन शेंगा अजून टाकतो ही गोष्ट मन्याला सुखावते. पण रिलायन्समध्ये ह्याचसाठी एक हजार नऊ ग्रामचे पैशे मोजावे लागतात. तिथं कुठंतरी मन्याचं मध्यमवर्गीय मन दुखावतं. आणि कोथिंबीरच्या जुडीला उगाचच कोरिएण्डर लीव्ज म्हणून विकत घ्यायला त्याचं मराठी मनही धजावत नाही.

असो. तर रिलायंस फ्रेशमध्ये मन्या फार वेळ घालवत नाही. चार-पाच भाज्या भराभरा निवडून बाहेर पडायचं हे त्याचं ठरलेलं आहे. आठवड्याच्या भाजीच्या नावाखाली चार-पाच दिवस पुरेल एवढीच भाजी आणायची अन उरलेले दोन दिवस बायकोला पिठलं किंवा खिचडी करायला लावायची ह्यामागेही मन्याचं एक छुपं आर्थिक नियोजन आहे. त्यासाठी बायकोला "तुझ्या हातच्या पिठल्याची चवचं खास" असंही तो अधूनमधून म्हणत असतो.

आजही मन्या भाज्या अन एक दह्याचं पाकीट घेऊन बिलिंग काउंटरवर आला.लेकीसाठी भेंडीसुद्धा घेतली होती. (सुपर मिलेनियल जनरेशनची आपली मुलगी भेंडीची भाजी आवडीने खाते अन डेरीमिल्क कॅडबरीला नाक मुरडते ह्यामागचं कोड मन्याला कधीच सुटत नव्हतं.) बिलिंग सुरु असताना काउंटरवरचा मुलगा मन्याला म्हणाला,
"सर सिस्टम में कुछ प्रॉब्लेम है. दही का प्राईस एमआरपीसे तीन रुपया ज्यादा दिखा राहा है."
"ऐसा कैसे?", मन्याने विचारलं.
"कुछ एरर है सर. कर दु बिलिंग?"
"नही रुको. तुम्हारा एरर है तुम ठीक करो. हंम क्यो भुगते?," मन्याने आवाज वाढवला.      
"नही हो सकता सर. आप दही मत लिजिए फिर."

ह्या एका गोष्टीची मन्याला नेहमीच चीड यायची. मागेही एकदा मॉल मध्ये असंच घडलं होतं. फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट लिहिलेल्या एका ड्रेसवर काहीच डिस्काउंट नाहीये असं पाऊण तास लायनीत उभं राहिल्यावर  काउंटरवरच्या फटाकड्या पोरीने सांगितलं होतं. शेवटी बायको आणि त्याहीपेक्षा त्या फटाकड्या पोरीसमोर इज्जत जाऊ नये म्हणून मन्याने तो ड्रेस खरेदी केला होता. पण आता इथे तीन रुपयासाठी मन्या असून बसला. शेवटी दही घेण्यासाठी परत एखाद्या दुकानात जावं लागेल असं विचार करून मन्याने तीन रुपये जास्त मोजून दही घेतलं. आणि "कोई सिस्टम नही है यहापे" अश्या तीव्र शब्दात निषेध नोंदवून मन्या बाहेर आला.

गाडीजवळ येताच, एकंदरीत आपलं बिल एवढं कमी कसं झालं हा प्रश्न मन्याला पडला. त्याने बिल चेक केलं. दह्याचे पकडून एकशे सदोतीस रुपये झाले होते. एखादा आयटम बिलात घ्यायचा राहिलाय का असा विचार करताना त्याला बिलात भेंडी लावलेली कुठेच दिसली नाही. पण भेंडी पिशवीत तर होतीचं. त्याने मुलीकडे बघितल्यावर त्याला आठवलं की, भेंडी घेतल्यापासून त्याचं पुडकं मुलीने छातीशी कवटाळून धरलं होतं. आणि मन्या काउंटरवर वाद घालत असताना मुलीने कदाचित ते पुडकं पिशवीत टाकलं असावं. त्यामुळे भेंडी बिलात आलीच नाही. साधारण बावीस रुपयाची भेंडी मन्याला फुकट मिळाली होती. पण मन्याला ते काही पटेना. पैसे देण्यासाठी तो परत आतमध्ये गेला.

काउंटरसमोर मारुतीच्या शेपटीएवढी रांग लागली होती. मन्याने लायनीत उभं राहायचं ठरवलं. पण पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात त्याला दह्यासाठी मोजलेल्या जास्तीच्या तीन रुपयांची आठवण झाली. तो जागच्या जागी थबकला. आणि अचानकच रिलायन्स जियोचे वाढलेले दर, अंबानीचा प्रशस्त बंगला, आयपीएल,नोटबंदी,जीएसटी वगैरे सगळ्याविषयीच असलेला त्याचा सात्विक राग उफाळून आला.

"लावतोच चुना आता ह्या अंबान्याला" असं म्हणून मन्या बाहेर आला.  

मन्या खुशीतच घरी आला. नकळतपणे का होईना अन बावीस रुपयाचंचं का होईना पण आपण अंबान्याचं नुकसान केलं ह्याचा त्याला आनंद झाला होतं. त्याने बायकोलासुद्धा सांगितलं. तिचे वेगळेच प्रश्न सुरु झाले.
"अहो ते ठीक आहे पण त्यांच्या कॅमेरात दिसलं तर?"
"काही दिसत नाही. दही आणलं आहे, तू कढी कर छान."

मस्त जेवण करून मन्या झोपायला गेला. त्याला झोप लागत नव्हती.अंबान्याचं नुकसान करण्याच्या नादात आपण चोरी केली आहे हे त्याच्या पांढरपेश्या मनातून जात नव्हतं. त्याने उठून परत बिल चेक केलं. बिलात शेवटल्या लायनीत Okra असं लिहून त्यासमोर बावीस रुपये लिहीलेले होते. मन्याने गूगलवर Okra शब्दाचा अर्थ चेक केला. आता भेंडीला इंग्रजीत Okra  म्हणतात हे मन्याच्या बापालाही माहिती असण्याची शक्यता नाहीये. तर मन्याची काय कथा!

शेवटी आपण चोरी केलेली नाहीये हे मन्याच्या लक्षात आलं.

"बघ साल्या अंबान्या तुझ्यासारखा नाहीये मी", असं म्हणून मन्या परत झोपायला गेला.

पण आता दह्यासाठी जास्तीचे मोजलेले तीन रुपये त्याचा डोळा लागू देत नव्हते !

समाप्त..

#Ambani #reliancejio #reliancefresh

Friday, 23 August 2019

लक्षात राहिलेले प्रसंग...


आपल्या इथे गाजलेल्या हिंदी-मराठी सिनेमांची संख्या कमी नाही. गुरुदत्त पासून ते अनुराग कश्यपपर्यंत  अनेक निर्माता-दिग्दर्शकांचे सिनेमे गाजले. सिनेमे येतात...गाजतात....आणि जातात. मागे उरते ती त्यांची चर्चा. त्या सिनेमातल्या चांगल्या गाण्यांची, प्रसंगांची आणि कलाकारांच्या अभिनयाची चर्चा पुढे वर्षानुवर्षे सुरु असते. उदाहरणार्थ...शोले म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे गब्बरसिंग आणि त्याच्या एंट्रीचा सीन....कितने आदमी थे????
गब्बरसिंगची एंट्री ह्याहून जबरदस्त होऊच शकली नसती. मान्य....एकदम मान्य!! पण मुद्दा जरा वेगळा आहे. ह्याच सिनेमात पुढे काही असे प्रसंग आहेत जे गब्बर ह्या व्यक्तिरेखेची व्यापकता जास्त परिणामकारकरीत्या दाखवतात.किंबहुना गब्बरच नव्हे तर संपूर्ण शोले सिनेमाचा इम्पॅक्ट त्या प्रसंगांमुळे जास्त वाढलेला आहे. पण असे प्रसंग लक्षात राहत नाहीत आणि त्यांची चर्चा होत नाही. अश्याच दुर्लक्षित पण जबरदस्त प्रसंगांची, संवादांची आणि अभिनयाची दखल घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.
सुरवात शोलेपासूनच...सिनेमाच्या उत्तरार्धात अहमदला (सचिन पिळगावकर) गब्बरची माणसं पकडून नेतात.
"सरदार ये रामगढ का लौंढा है.स्टेशन जा राहा था.हमने उठा लिया"
हे ऐकताच खाटेवर झोपलेला गब्बर अहमदकडे न बघता स्वत:च्या हातावर फिरणाऱ्या किड्याला निर्दयीपणे चिरडून टाकतो. कट टू..अहमदचं प्रेत घेऊन घोडा हळूहळू गावात शिरतो.
निर्दयी गब्बरसिंगमधला कोल्ड ब्लडेड मर्डरर इथे दिसून येतो. गब्बरच्या लेखी रामगढ, तिथले रहिवासी ह्यांची काय किंमत आहे हे तो मुंगीला चापट मारून दाखवतो. 
दुसरा सिनेमा : दिवार  (दिग्दर्शक: यश चोप्रा)
गाजलेला प्रसंग आणि डायलॉग : मेरे पास माँ है.. / मैं आज भी फेके हुए पैसे नही उठाता
ह्या सिनेमात विजय (अमिताभ बच्चन) श्रीमंत झाल्यावर एक इमारत विकत घेतो असा प्रसंग आहे. त्यात इमारतीचा सौदा पूर्ण झाल्यावर मूळ मालक विजयला म्हणतो,
"अब सौदा पुरा हो गया. पर एक बात कहू. आपने घाटे का सौदा किया. अगर आप केहते तो इस पुरानी इमारत के मैं पाच-दस लाख रुपये कम भी कर देता. माफ किजीये, पर आपको धंदा करना नही आता."

यावर विजय उत्तरतो," धंदा करना तो आपको नही आता सेठ. ये इमारत जब बन रही थी, तो मेरी माँ ने यहाँ इटे उठाई थी. और आज ये ईमारत मैं उसे तोहफे में देने जा रहा हु. अगर आप तो इस ईमारत के मैं पांच-दस लाख रुपये और दे देता. धंदा करना तो आपको नही आता."

आईवर झालेला अन्याय, तिने घेतलेले कष्ट ह्याचा विजयवर किती परिणाम झालेला असतो हे ह्या प्रसंगात अधोरेखित होते. विजयने स्वीकारलेल्या चुकीच्या मार्गाची पाळेमुळे त्याच्या आईच्या अश्रूमध्ये असतात. बांधकामावर असलेला मुकादम जेंव्हा विजयाच्या आईचा अपमान करतो तेंव्हा विजय त्याला दगड फेकून मारतो. हा दगड विजयने त्या संपूर्ण समाजवरंच फेकलेला असतो. इथूनच नैतिक-अनैतिकतेचे सगळे बंधनं झिडकारून तो आईचे अश्रू पुसायचे ठरवतो. मुळात समाजाची सिलेक्टिव्ह नैतिकता त्याने जवळून अनुभवली असते. आणि वरील प्रसंग हे विजयने समाजाला दिलेले उत्तर आहे. ह्या सिनेमात शेवटी नैतिकता जिंकताना दाखवली असली तरी का कोण जाणे अनैतिक विजय जास्त जवळचा वाटतो.
ह्या सिनेमात एका प्रसंगात, विजय आणि त्याचे सहकारी चर्चा करत असतात.
"विजय, इतने खतरे में तुम्हारा अकेले जाना ठीक नहीं. क्या तुम्हे लगता है के ये काम तुम अकेले कर सकते हो?"
"नहीं ! मैं जानता हु के ये काम मैं अकेले कर सकता हु"
अफाट प्रसंग आहे हा. धंद्यात नवीन असल्याने विजयवर काही लोकांचा फारसा विश्वास नसतो. पण विजयाचा स्वत:वर जबरदस्त विश्वास असतो. ह्यात अमिताभचे डोळे आणि संवादफेक पाहावी.
ह्या सिनेमात आधी एक विनोदी म्हणावा असा प्रसंग आहे. विजयाचा धाकटा भाऊ रवी (शशी कपूर) नोकरीसाठी वणवण फिरत असतो. एकदा तो मैत्रिणीच्या वडिलांना भेटतो. ते पोलीस कमिशनर असतात.
ते विचारतात," तो रवी बेटा आजकल क्या कर रहे हो?"
स्वतःच्या बेरोजगारीची लाज वाटून रवी म्हणतो," अब आपसे क्या छुपाना सर. मैं आजकल कुछ नही कर रहा हू."
कमिशनर सहजतेने म्हणतात," कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ."
मुंबई पोलीस कमिशनरच्या तोंडी काही करत नसशील तर पोलिसात ये हे वाक्य देऊन लेखकाला काय दाखवायचे होते देवाला माहिती !

सिनेमा: त्रिशूल
गाजलेला प्रसंग/संवाद : मैं यहा आपसे पाच लाख का सौदा करने आया हू और मेरी जेब मी पाच फुटी कवडीया भी नही है !
त्रिशूल सिनेमातला प्रत्येक प्रसंग अगदी डोळ्यात भरून घ्यावा असाच आहे. कथा वेगळी असली तरी मूळ आशय अन्याय आणि त्याविरुद्ध घेतलेला प्रतिशोध असाच आहे. दिवार आणि त्रिशूलमधली अमिताभची व्यक्तिरेखा बरीचशी सारखी आहे. पण दिवारमधला विजय एका संधीच्या प्रतीक्षेत असतो. ती मिळताच तो स्वतःवरचा अन्याय झुगारून देतो. तर त्रिशूलमधला विजय अन्यायाला झुगारून देण्यासाठी स्वतः संधी निर्माण करतो. दोघांचाही आत्मविश्वास अमिताभने नजरेतूनच दाखवला आहे. त्रिशूलमध्ये विजय हा बिल्डर आर के गुप्ता ह्यांचा अनौरस पुत्र असतो. वडिलांनी आईवर आणि पर्यायाने स्वतः वर केलेला अन्याय त्याला सहन होत नाही. बिल्डर आर के गुप्ता ह्यांना त्यांच्याच बिझीनेसमध्ये पराभूत करून बरबाद करण्यासाठी विजय शहरात येतो. आणि हळूहळू तो यशस्वी होतो.

ह्यात काही फार सुंदर प्रसंग आहेत,
बिझनेसमध्ये शिरल्यावर कुठल्याश्या एका टेंडरमध्ये आर के गुप्तांच्या कंपनीला विजय मात देतो आणि तो प्रकल्प मिळवतो. ह्या यशासाठी तो शहरातल्या इतर उद्योजकांना एक जंगी पार्टी देतो. ह्या पार्टीविषयी बोलताना विजय गीताला (राखी गुलजार) म्हणतो, 
"गीता इस पार्टी के लिये शहर के तमाम बडे लोगोको न्योता भेजो. और हा.. आर के गुप्ता और फॅमिली को बुलाना मत भुलना. वो अबतक इस शहर के बडे आदमी है !"

आपण आर के गुप्ताला हारवणारच ह्याविषयी विजयला कमालीचा आत्मविश्वास असतो. तोच त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसतो. विजय प्रत्येक टेंडर केवळ एका रुपयाच्या फरकाने जिंकतो. ही थोडीशी अतिशयोक्ती असली तरी आर के गुप्ताला त्याची लायकी दाखवण्यासाठी वापरेललं हे एक रुपयाचं रूपक खूप समर्पक आहे. आर के गुप्ता हुशार असतात. मेहनती असतात. आणि धंद्यात प्रामाणिकसुद्धा असतात.पण हा सिनेमा विजयाच्या दृष्टीकोनातून बघायचा आहे. त्याची माणसं ओळखण्याची आणि हाताळण्याची पद्धत वेगळी असते.

ह्याच सिनेमात आधी एक प्रसंग आहे. गीता (राखी गुलजार) ही आधी आर के गुप्तांच्या कंपनीत कामाला असते. आर के गुप्तांच्या टेंडरची किंमत जाणून घ्यायला विजय त्यांच्याचं एका कारकुनाला (भंडारी) पैसे देतो. पण पैसे घेतल्याचा आळ गीतावर येतो. आर के गुप्ता तिला नोकरीवरून काढून टाकतात. हे विजयला कळताच तो तडक आर के गुप्तांना भेटतो आणि सत्य परिस्थिती सांगतो. गीतासारख्या प्रामाणिक मुलीवर तुम्ही अन्याय केला हे ही सांगतो. आर के गुप्ता ओशाळतात.
ते म्हणतात," मिस्टर विजय, माना की मैने गलती की है. पर भंडारी तुम्हारी मदत कर रहा था. गीताको बचाने  के लिये तुमने खुद का नुकसान क्यो करवाया?"
ह्यावर विजय सडेतोड उत्तर देतो,
"जिंदगी में कुछ बातें फायदे और नुकसान से ऊपर होती है मिस्टर आर के गुप्ता.... मगर अफ़सोस के कुछ लोग इसे समझ नहीं पाते."
माझ्या मते, हिंदी सिनेमातल्या काही सर्वोत्कृष्ट संवादांमध्ये हा संवाद येतो. ह्यात विजयच्या डोळ्यातले बदलणारे भाव बघावेत. आर के गुप्तांच्या आचारविचारांविषयी असलेला राग, त्याविषयी वाटणारी घृणा अन त्याचवेळी वाटणारी कीव हे तीनही भाव अमिताभने दाखवले आहेत. विजयचं ध्येय खूप स्पष्ट असते. त्याला स्वतःच्या फायद्यापेक्षा आर के गुप्तांचे नुकसान करण्यात जास्त रस असतो. पण हे करताना कोणाही निर्दोष व्यक्तीला त्रास देऊन त्याला दुसरा आर के गुप्ता बनायचं नसतं.

सिनेमात शेवटी आणखी एक जबरदस्त प्रसंग आहे. ज्यात सिनेमाचे त्रिशूल हे नाव सार्थ होते. विजयमुळे आर के गुप्ता धंद्यात पूर्णतः बरबाद होतात. हा विजयाचा पहिला वार! विजय आणि आर के गुप्तांचं खरं नातं कळल्यानंतर त्यांची मुलेसुद्धा दुरावतात. हा विजयचा दुसरा वार!

घरात हताश अवस्थेत बसलेल्या आर के गुप्तांना भेटायला विजय येतो. विजय स्वतः ची ओळख सांगून त्यांची पूर्ण मालमत्ता त्यांना वापस करतो. त्यावेळचा संवाद,
" जिस दौलत के लिए आपने ने मेरी माँ को दुनिया की ठोकरे खाने के लिए अकेला छोड़ दिया था. आज वही दौलत मैं मेरी माँ के तरफ आपको देने आया हु. आज आपके पास आपकी सारी दौलत है, लेकिन आपसे बड़ा गरीब मैंने नहीं देखा !!"

हा विजयचा तीसरा वार !!

त्रिशूल !!

समाप्त