Friday 23 August 2019

लक्षात राहिलेले प्रसंग...


आपल्या इथे गाजलेल्या हिंदी-मराठी सिनेमांची संख्या कमी नाही. गुरुदत्त पासून ते अनुराग कश्यपपर्यंत  अनेक निर्माता-दिग्दर्शकांचे सिनेमे गाजले. सिनेमे येतात...गाजतात....आणि जातात. मागे उरते ती त्यांची चर्चा. त्या सिनेमातल्या चांगल्या गाण्यांची, प्रसंगांची आणि कलाकारांच्या अभिनयाची चर्चा पुढे वर्षानुवर्षे सुरु असते. उदाहरणार्थ...शोले म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे गब्बरसिंग आणि त्याच्या एंट्रीचा सीन....कितने आदमी थे????
गब्बरसिंगची एंट्री ह्याहून जबरदस्त होऊच शकली नसती. मान्य....एकदम मान्य!! पण मुद्दा जरा वेगळा आहे. ह्याच सिनेमात पुढे काही असे प्रसंग आहेत जे गब्बर ह्या व्यक्तिरेखेची व्यापकता जास्त परिणामकारकरीत्या दाखवतात.किंबहुना गब्बरच नव्हे तर संपूर्ण शोले सिनेमाचा इम्पॅक्ट त्या प्रसंगांमुळे जास्त वाढलेला आहे. पण असे प्रसंग लक्षात राहत नाहीत आणि त्यांची चर्चा होत नाही. अश्याच दुर्लक्षित पण जबरदस्त प्रसंगांची, संवादांची आणि अभिनयाची दखल घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.
सुरवात शोलेपासूनच...सिनेमाच्या उत्तरार्धात अहमदला (सचिन पिळगावकर) गब्बरची माणसं पकडून नेतात.
"सरदार ये रामगढ का लौंढा है.स्टेशन जा राहा था.हमने उठा लिया"
हे ऐकताच खाटेवर झोपलेला गब्बर अहमदकडे न बघता स्वत:च्या हातावर फिरणाऱ्या किड्याला निर्दयीपणे चिरडून टाकतो. कट टू..अहमदचं प्रेत घेऊन घोडा हळूहळू गावात शिरतो.
निर्दयी गब्बरसिंगमधला कोल्ड ब्लडेड मर्डरर इथे दिसून येतो. गब्बरच्या लेखी रामगढ, तिथले रहिवासी ह्यांची काय किंमत आहे हे तो मुंगीला चापट मारून दाखवतो. 
दुसरा सिनेमा : दिवार  (दिग्दर्शक: यश चोप्रा)
गाजलेला प्रसंग आणि डायलॉग : मेरे पास माँ है.. / मैं आज भी फेके हुए पैसे नही उठाता
ह्या सिनेमात विजय (अमिताभ बच्चन) श्रीमंत झाल्यावर एक इमारत विकत घेतो असा प्रसंग आहे. त्यात इमारतीचा सौदा पूर्ण झाल्यावर मूळ मालक विजयला म्हणतो,
"अब सौदा पुरा हो गया. पर एक बात कहू. आपने घाटे का सौदा किया. अगर आप केहते तो इस पुरानी इमारत के मैं पाच-दस लाख रुपये कम भी कर देता. माफ किजीये, पर आपको धंदा करना नही आता."

यावर विजय उत्तरतो," धंदा करना तो आपको नही आता सेठ. ये इमारत जब बन रही थी, तो मेरी माँ ने यहाँ इटे उठाई थी. और आज ये ईमारत मैं उसे तोहफे में देने जा रहा हु. अगर आप तो इस ईमारत के मैं पांच-दस लाख रुपये और दे देता. धंदा करना तो आपको नही आता."

आईवर झालेला अन्याय, तिने घेतलेले कष्ट ह्याचा विजयवर किती परिणाम झालेला असतो हे ह्या प्रसंगात अधोरेखित होते. विजयने स्वीकारलेल्या चुकीच्या मार्गाची पाळेमुळे त्याच्या आईच्या अश्रूमध्ये असतात. बांधकामावर असलेला मुकादम जेंव्हा विजयाच्या आईचा अपमान करतो तेंव्हा विजय त्याला दगड फेकून मारतो. हा दगड विजयने त्या संपूर्ण समाजवरंच फेकलेला असतो. इथूनच नैतिक-अनैतिकतेचे सगळे बंधनं झिडकारून तो आईचे अश्रू पुसायचे ठरवतो. मुळात समाजाची सिलेक्टिव्ह नैतिकता त्याने जवळून अनुभवली असते. आणि वरील प्रसंग हे विजयने समाजाला दिलेले उत्तर आहे. ह्या सिनेमात शेवटी नैतिकता जिंकताना दाखवली असली तरी का कोण जाणे अनैतिक विजय जास्त जवळचा वाटतो.
ह्या सिनेमात एका प्रसंगात, विजय आणि त्याचे सहकारी चर्चा करत असतात.
"विजय, इतने खतरे में तुम्हारा अकेले जाना ठीक नहीं. क्या तुम्हे लगता है के ये काम तुम अकेले कर सकते हो?"
"नहीं ! मैं जानता हु के ये काम मैं अकेले कर सकता हु"
अफाट प्रसंग आहे हा. धंद्यात नवीन असल्याने विजयवर काही लोकांचा फारसा विश्वास नसतो. पण विजयाचा स्वत:वर जबरदस्त विश्वास असतो. ह्यात अमिताभचे डोळे आणि संवादफेक पाहावी.
ह्या सिनेमात आधी एक विनोदी म्हणावा असा प्रसंग आहे. विजयाचा धाकटा भाऊ रवी (शशी कपूर) नोकरीसाठी वणवण फिरत असतो. एकदा तो मैत्रिणीच्या वडिलांना भेटतो. ते पोलीस कमिशनर असतात.
ते विचारतात," तो रवी बेटा आजकल क्या कर रहे हो?"
स्वतःच्या बेरोजगारीची लाज वाटून रवी म्हणतो," अब आपसे क्या छुपाना सर. मैं आजकल कुछ नही कर रहा हू."
कमिशनर सहजतेने म्हणतात," कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ."
मुंबई पोलीस कमिशनरच्या तोंडी काही करत नसशील तर पोलिसात ये हे वाक्य देऊन लेखकाला काय दाखवायचे होते देवाला माहिती !

सिनेमा: त्रिशूल
गाजलेला प्रसंग/संवाद : मैं यहा आपसे पाच लाख का सौदा करने आया हू और मेरी जेब मी पाच फुटी कवडीया भी नही है !
त्रिशूल सिनेमातला प्रत्येक प्रसंग अगदी डोळ्यात भरून घ्यावा असाच आहे. कथा वेगळी असली तरी मूळ आशय अन्याय आणि त्याविरुद्ध घेतलेला प्रतिशोध असाच आहे. दिवार आणि त्रिशूलमधली अमिताभची व्यक्तिरेखा बरीचशी सारखी आहे. पण दिवारमधला विजय एका संधीच्या प्रतीक्षेत असतो. ती मिळताच तो स्वतःवरचा अन्याय झुगारून देतो. तर त्रिशूलमधला विजय अन्यायाला झुगारून देण्यासाठी स्वतः संधी निर्माण करतो. दोघांचाही आत्मविश्वास अमिताभने नजरेतूनच दाखवला आहे. त्रिशूलमध्ये विजय हा बिल्डर आर के गुप्ता ह्यांचा अनौरस पुत्र असतो. वडिलांनी आईवर आणि पर्यायाने स्वतः वर केलेला अन्याय त्याला सहन होत नाही. बिल्डर आर के गुप्ता ह्यांना त्यांच्याच बिझीनेसमध्ये पराभूत करून बरबाद करण्यासाठी विजय शहरात येतो. आणि हळूहळू तो यशस्वी होतो.

ह्यात काही फार सुंदर प्रसंग आहेत,
बिझनेसमध्ये शिरल्यावर कुठल्याश्या एका टेंडरमध्ये आर के गुप्तांच्या कंपनीला विजय मात देतो आणि तो प्रकल्प मिळवतो. ह्या यशासाठी तो शहरातल्या इतर उद्योजकांना एक जंगी पार्टी देतो. ह्या पार्टीविषयी बोलताना विजय गीताला (राखी गुलजार) म्हणतो, 
"गीता इस पार्टी के लिये शहर के तमाम बडे लोगोको न्योता भेजो. और हा.. आर के गुप्ता और फॅमिली को बुलाना मत भुलना. वो अबतक इस शहर के बडे आदमी है !"

आपण आर के गुप्ताला हारवणारच ह्याविषयी विजयला कमालीचा आत्मविश्वास असतो. तोच त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसतो. विजय प्रत्येक टेंडर केवळ एका रुपयाच्या फरकाने जिंकतो. ही थोडीशी अतिशयोक्ती असली तरी आर के गुप्ताला त्याची लायकी दाखवण्यासाठी वापरेललं हे एक रुपयाचं रूपक खूप समर्पक आहे. आर के गुप्ता हुशार असतात. मेहनती असतात. आणि धंद्यात प्रामाणिकसुद्धा असतात.पण हा सिनेमा विजयाच्या दृष्टीकोनातून बघायचा आहे. त्याची माणसं ओळखण्याची आणि हाताळण्याची पद्धत वेगळी असते.

ह्याच सिनेमात आधी एक प्रसंग आहे. गीता (राखी गुलजार) ही आधी आर के गुप्तांच्या कंपनीत कामाला असते. आर के गुप्तांच्या टेंडरची किंमत जाणून घ्यायला विजय त्यांच्याचं एका कारकुनाला (भंडारी) पैसे देतो. पण पैसे घेतल्याचा आळ गीतावर येतो. आर के गुप्ता तिला नोकरीवरून काढून टाकतात. हे विजयला कळताच तो तडक आर के गुप्तांना भेटतो आणि सत्य परिस्थिती सांगतो. गीतासारख्या प्रामाणिक मुलीवर तुम्ही अन्याय केला हे ही सांगतो. आर के गुप्ता ओशाळतात.
ते म्हणतात," मिस्टर विजय, माना की मैने गलती की है. पर भंडारी तुम्हारी मदत कर रहा था. गीताको बचाने  के लिये तुमने खुद का नुकसान क्यो करवाया?"
ह्यावर विजय सडेतोड उत्तर देतो,
"जिंदगी में कुछ बातें फायदे और नुकसान से ऊपर होती है मिस्टर आर के गुप्ता.... मगर अफ़सोस के कुछ लोग इसे समझ नहीं पाते."
माझ्या मते, हिंदी सिनेमातल्या काही सर्वोत्कृष्ट संवादांमध्ये हा संवाद येतो. ह्यात विजयच्या डोळ्यातले बदलणारे भाव बघावेत. आर के गुप्तांच्या आचारविचारांविषयी असलेला राग, त्याविषयी वाटणारी घृणा अन त्याचवेळी वाटणारी कीव हे तीनही भाव अमिताभने दाखवले आहेत. विजयचं ध्येय खूप स्पष्ट असते. त्याला स्वतःच्या फायद्यापेक्षा आर के गुप्तांचे नुकसान करण्यात जास्त रस असतो. पण हे करताना कोणाही निर्दोष व्यक्तीला त्रास देऊन त्याला दुसरा आर के गुप्ता बनायचं नसतं.

सिनेमात शेवटी आणखी एक जबरदस्त प्रसंग आहे. ज्यात सिनेमाचे त्रिशूल हे नाव सार्थ होते. विजयमुळे आर के गुप्ता धंद्यात पूर्णतः बरबाद होतात. हा विजयाचा पहिला वार! विजय आणि आर के गुप्तांचं खरं नातं कळल्यानंतर त्यांची मुलेसुद्धा दुरावतात. हा विजयचा दुसरा वार!

घरात हताश अवस्थेत बसलेल्या आर के गुप्तांना भेटायला विजय येतो. विजय स्वतः ची ओळख सांगून त्यांची पूर्ण मालमत्ता त्यांना वापस करतो. त्यावेळचा संवाद,
" जिस दौलत के लिए आपने ने मेरी माँ को दुनिया की ठोकरे खाने के लिए अकेला छोड़ दिया था. आज वही दौलत मैं मेरी माँ के तरफ आपको देने आया हु. आज आपके पास आपकी सारी दौलत है, लेकिन आपसे बड़ा गरीब मैंने नहीं देखा !!"

हा विजयचा तीसरा वार !!

त्रिशूल !!

समाप्त

No comments:

Post a Comment