Tuesday 24 November 2015

आमिर आणि शाहरुख

मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर  मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय  तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..

नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!

Wednesday 1 July 2015

माझं करीयर मार्गदर्शन (!)

परवाच एक नात्यातला मुलगा भेटला. त्याने नुकतेच इंजिनियरिंग पूर्ण केले होते. भारतीय परंपरेप्रमाणे इंजिनियर झाल्यावर तो पुढे आयुष्यात आपण काय करायच ह्याचा विचार करत होता. बऱ्याच मुलांना इंजिनियरिंग हे आपलं  क्षेत्र नाही ही जाणीव शेवटल्या वर्षपर्यन्त होते. पण इथपर्यन्त आलोच आहे तर शेवट बघूनच घेऊ, या विचाराने ते पदवी पूर्ण करतात. कारण इंजिनियरिंग हे मुंबई लोकलच्या गर्दीसारखं असते. लोकल मध्ये चढणं हेच एक आव्हान आहे. आणि एकदा चढलं की नक्की कुठे उतरायचं हे माहिती नसलं तरी आसपासची गर्दी आपल्याला तिथे उतरवतेच. मग स्टेशनचं नाव वाचल्यावर आपण चुकीच्या ठिकाणी आलो हे लक्षात येते. आता दुसरी लोकल पकडणे शक्य नसते. शेवटी आपण त्या गर्दीचाच एक भाग होतो.
असो. तर त्या मुलाला माझ्याकडून थोडं करीयर मार्गदर्शन हवं होतं. आमच्यात संवाद सुरु झाला.
मी त्याला विचारलं," काय राजे? कसं वाटतंय इंजिनियर झाल्यावर?"
"मस्त वाटतंय"
"मग पुढे काय ठरवलंय?"
"तेच ठरवायचं आहे. तुमचं थोडं मार्गदर्शन हवं होतं"
"अरे जरूर ..आवडेल मला..मला सांग इंजिनियरिंग का केलंस तू? म्हणजे आवड की अजून काही ?"
स्व.सर विश्वेशरैय्या आणि ३ इडीयट्समधला रॅंचो सोडून या प्रश्नाच उत्तर कोणालाही सापडलं असेल का याबद्दल मला दाट शंका आहे!
तो उत्तरला," बारावीला चांगले मार्क होते. मग घरातले सगळे म्हणाले की..........."
"बरं बरं..मग नोकरी करायचा विचार आहे का आता?”
"हो"
"बरं मग त्याविषयी काही शंका असेल तर विचार मला."
"करीयरच्या सुरवातीला पहिली कंपनी कशी निवडावी?"
मी बुचकळ्यात पडलो. आपण कंपनी निवडायची असते हे याला कोणी सांगितलं? तसं कॉलेज मध्ये असताना मलाही वाटायचं की आपण आपल्याला पाहिजे त्याच कंपनीत जायचंमनापासून आवडेल तेच काम करायचंआपले छंद जपायचे वर्क- लाईफ बॅलन्स वगैरे भ्रामक कल्पना मीसुद्धा केल्या होत्या. पण कॉलेज संपल्यावर या सगळ्या कल्पना गळून पडल्या
मी म्हणालो," आधी तुला कुठल्या क्षेत्रात जायचंय ते ठरवं. मग त्या क्षेत्रातल्या कंपन्या शोध. आणि मुलाखत देत रहा."
आता या वाक्याचा मनात म्हटलेला उत्तरार्ध खालीलप्रमाणे होता.
"शेवटी कोणतीही  कंपनी आपल्याला भाव देत नाहीये हे लक्षात येइलच. मग मिळेल ती नोकरी स्वीकारून गप गुमान बसं!"
"मुलाखतीची तयारी कशी करावी ?", त्याने विचारले.
या प्रश्नाचा दुसरा अर्थ मुलाखतीत विचारणाऱ्या प्रश्नांचे '२१ अपेक्षित' कुठे मिळते असा होतो.
मला एकदम कॉलेजमधले व्हायव्हाचे दिवस आठवले. पहिल्या रोलनंबरचा मुलगा व्हायव्हा देऊन बाहेर आला की आम्ही सगळे त्याला घेरून ," काय विचारते बे मास्तर ?" असे प्रश्न विचारून भंडावून सोडायचो. अर्थात मास्तरनी काहीही विचारलं तरी आपल्याला येणार नाहीये हे माहिती असायचं. मग मास्तरसमोर उगाचच  विचारीमुद्रेचा अभिनय करून, दोन-चार इकडतिकडचे शब्द जोडून उत्तर तयार व्हायचं. मास्तरांची सहनशक्ती संपली की ते बाहेर हाकलायचे.
मी म्हणालो," आधी तर तुझ्या क्षेत्रातले बेसिक कन्सेप्ट्स क्लियर करून घे"
हा सल्ला काही जगावेगळा नव्हता. पण मी तो देण्यामागचं कारण होतं, 'मी दिलेली पहिली मुलाखत'!
"इंजीनियरिंगमध्ये तुमचा आवडता विषय कोणता होता?”, एका नामांकित कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंटने मला मुलाखती दरम्यान विचारले.
बोंबला!! आता काय सांगाव? कोणताही विषय सांगितला तर त्यावर हा मला फाडून खाणार हे निश्चित.
"थर्मोडायनामिक्स!" मी सांगितले.
थर्मोडायनामिक्स शिकवणाऱ्या सरांची शप्पथ घेऊन सांगतो की मी खोटं बोलत होतो. परीक्षेत माझ्या समोर बसणाऱ्या मित्राने जर हे उत्तर ऐकलं असतं तर तिथेच मला झोडपून काढलं असतं. पण आत्ता तो माझ्या समोर बसला नव्हता. माझी मुलाखत सुरु होती. शिवाय इतर विषयांपेक्षा या विषयाचा अभ्यास मला जरा जास्त वेळ (वेळा!) करावा लागला होता. त्यामुळे ह्यातलं ज्ञान इतर विषयांपेक्षा - टक्क्यांनी जास्त असल्याची माझी समजूत होती. (चाळीस अधिक तीन-चार म्हणजे चौरेचाळीस टक्के असा हिशोबही मनातल्या मनात मी करून टाकला !)
"ओह्ह.. आय सी", व्हाइस प्रेसिडेंट.
त्यांच्या चेहऱ्यावरचा आसुरी आनंद लपत नव्हता. आणि माझ्या चेहऱ्यावरचे शुन्य भावही त्यांनी टिपले असतीलच.
कॅन यु एक्सप्लेन दी  सिमील्यारीटी बिटविन फ़र्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ?"
एव्हढंच  ना ! फ़र्स्ट अँड सेकंड लॉच्या भरवश्यावरंच तर परिक्षा (एकदाची!) पास झालो होतो. मी भडाभडा उत्तर दिले. आणि विचारलेले नसताना आगाऊपणा करून समोरच्या कागदावर उदाहरणसुद्धा एक्सप्लेन करून दिले.
"गुड, व्हेरी गुड पॉवर प्लांटमध्ये थर्मोडायनामिक्सचं अप्लिकेशन कसं असतं जरा सांग ", ते म्हणाले. (ही मुलाखत बहुभाषिक पद्धतीने सुरु होती)
अरे देवां पहिल्या लोवर फुलटॉसवर षटकार मारल्यावर पुढचा चेंडू असा ब्लॉक होलमध्ये आला तर सेहवागची जी अवस्था होईल तशी माझी झाली होती. पण शेवटी सेहवाग तो सेहवागच! थर्मोडायनामिक्सशी संबंधित तीन -चार शब्द पकडून मी अंदाधुंद फटकेबाजी सुरु केली. साधारण १५ मिनिटे बोलल्यावर त्यांनी मला थांबवलं.
ते म्हणाले," यंग मॅन टुडे यु हॅव चेंज्ड माय बेसिक कन्सेप्ट्स ऑफ थर्मोडायनामिक्स!!"
"पण मुलाखतीत फक्त बेसिक कन्सेप्ट्स विचारतात का?", त्याच्या या प्रश्नाने मी भानावर आलो.
"फ्रेशर्स मुलांना तरी तेच विचारतात", मी उत्तरलो.
"पण असं का? असे सोपे प्रश्न विचारून त्यांना माझ्यातलं टॅलेंट कसं कळणार?"
(अरे मग पहिल्याच दिवशी तुला काय क्रायोजेनिक इंजिन डिझाईन करायला सांगणार का? की एक्स्प्रेस वे कसा बांधतात ते विचारणार? की स्विस बँकेसाठी सॉफ्टवेयर बनवायला सांगणार? -- माझ्या मनातलं उत्तर!)
"हे बघ असं नसतं...आधी तुझी आकलनशक्ती, ज्ञान, समज, योग्यता यांची पारख केल्या जाते. त्यात तू पास झाला तरच तुझी निवड करतात.मग तुला योग्य ते प्रशिक्षण देऊन छोटे-मोठे काम देतात. नंतर तुझं टॅलेंट दाखवायला तू मोकळा आहेस."
"पण हे तर चुकीचं आहे ना!”
"का? ह्यात चुकीचे काय वाटतंय तुला?”, मी म्हणालो.
"ते नाही सांगता येणार. पण चुकीचं आहे हे निश्चित!” तो ठामपणे म्हणाला.
साधारणपणे सगळ्या नवख्यांना प्रस्थापित गोष्टी चुकीच्याच वाटतात. परीक्षांमध्ये मिळालेले थोडेबहुत मार्क्स  आणि कॉलेजमधले दोन -चार कार्यक्रम आयोजित करण्याचा अनुभव गाठीशी घेऊन हे नवखे अख्ख्या भांडवलशाहीच्या विरोधात उभे राहण्याच्या बेतात असतात. इंजीनीयरिंग किंवा अन्य कोणतेही शिक्षण पूर्ण केले म्हणजे आपण एक युद्ध जिंकून आता नव्या युगाच्या नेतृत्वासाठी सज्ज आहोत अश्या आविर्भावात वावरतात. आम्हीही असेच होतो. बरं एखादी कंपनी, तिथले कामाचे स्वरूप आणि ह्यांचे त्याविषयीचे स्वप्नरंजन हे सर्वस्वी भिन्न असते. उदा. रिसर्च आणि डेव्हलपमेण्टमध्ये जाऊ पाहणाऱ्या नवख्यांना, तिकडे गेल्यावर आपण डायरेक्ट पाण्यावर धावणाऱ्या गाडीचेचं संशोधन करणार असं काहीसं वाटतं असते. किंवा सॉफ्टवेयर कंपनीत गेल्यावर दुसऱ्याच दिवशी आपल्याला अमेरिकेच्या विमानात बसवणार अशी रम्य कल्पना असते.
"तुमच्या क्षेत्रात माझ्यासाठी काही स्कोप आहे का?", त्याने विचारले.
"आहे ना...पण नको येऊ आमच्याइथे.काही खरं नाही. मलाच पश्चाताप होतो कधीकधी."
हा प्रश्न त्यानी मलाच काय अगदी बिल गेट्सला जरी विचारला असता तरी हेच उत्तर आलं असतं !
"मग काय करू मी? बाबा म्हणतायेत एमबीए कर"
"अरे मग कर ना..बरोबर सांगतायेत ते. हे बघ हेच वय असतं शिकण्याच. नंतरच काही सांगता येत नाही. खूप अडचणी येतात."
आता हे संभाषण जरा सोप्या ट्रॅकवर आलं होतं. काय आहे की कोणालाही, अरे तू हे शिक..तू ते शिक असं सांगणं खूप सोपं असतं. त्यातही एमबीए हे एक गोग्गोड स्वप्न आहे ज्यात कोणीही सहज फसतं. बीई,एमबीए किंवा बीएस्ससी,एमबीए असं बिरुद नावामागे लागलं की आपलं पोरगं एकतर जनरल मॅनेजर तरी होईल किंवा वॉलमार्टसारखी कंपनी तरी सुरु करेल असं सगळ्या पालकांना वाटतं.
"एमबीए करून पुढे काय स्कोप आहे?",त्याने विचारले.
"फक्त स्कोप वगैरे असा विचार करू नको रे. कदाचित एमबीए करूनही तुला तेव्हढ्याच पगाराची नोकरी मिळेल पण ते शिक्षण कधी ना कधी उपयोगी पडेलच."
"पटतंय मला तुमचं. एमबीए करणंच बरोबर ठरेल"
"हो...पण फक्त मी किंवा तुझे बाबा म्हणतायेत म्हणून करू नको. तुझी इच्छा असेल तरच कर"
"हो"
आता मी 'नरो वा कुंजरो वा' या भूमिकेत शिरलो होतो. शिक्षण कधीच वाया जात नाही हे वादातीत वाक्य मी बोललो होतो. आणि अर्थात अतिशिक्षणाचा फायदा काय ह्यावर गप्प बसलो होतो. इथे आमचं संभाषण संपलं. तो समाधानी होऊन त्याच्या घरी गेला. मी त्याच्या वडीलांकडून मिळणारे आशीर्वाद आणि २ वर्षांनी त्याच्याकडून मिळणारे शिव्याशाप ह्यांचा विचार करत बसलो.

                                                                  -- चिनार 

Thursday 4 June 2015

राजमहालातला एक दिवस

या आधीच्या 'संसदेतील एक दिवस' आणि 'शेतातील एक दिवस' या दोन लेखांच्याच धरतीवर हे पुढील लेखन प्रकाशित करत आहे.
आज सकाळपासूनच विकासपुरुष आपल्या भव्य प्रासादात अस्वस्थपणे चकरा मारत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण दिसत होता. सेवकांची तर आतमध्ये जाण्याची पण हिम्मत होत नव्हती.
विकसपुरुष  : कोण आहे रे तिकडे ?
सेवक : जी..मी आहे हुजूर. आज्ञा द्यावी.
विपु. : अरे मी कोण आज्ञा देणारा ? आज्ञा वरतून आलीये.
सेवक : लहान तोंडी मोठा घास घेतो हुजूर पण नागपूर तर दक्षिणेकडे आहे आपल्या राजवाड्याच्या ..उत्तरेकडून आज्ञा कशी काय आली जी ?
विपु.: अरे गाढवा..वरतून  म्हणजे महामहीम यांनी दिलीये आज्ञा ..
सेवक : काय आज्ञा दिली जी ?
विपु.: जास्त आज्ञा देऊ नका अशी आज्ञा दिलीये त्यांनी !
सेवक : म्हणजे काय जी ?
विपु.: म्हणतायेत लोकशाहीला बांधील आहो आपण हे विसरू नका..सारखे सारखे "हुकुम" काढून आपली "वट" दाखवू नका !
सेवक : मग बरोबर आहे की जी !
विपु.: अरे काय बरोबर आहे ? अश्याने विकास कसा होणार?
सेवक : कोणाचा ?
विपु.: कोणाचा म्हणजे ...देशाचा !
सेवक : एक बोलू का जी ? इथं जो येतो तो या विकासाच्याच मागे लागतो..सतत विकास विकास करत राहतो..कोण आहे कोण हा विकास ?
विपु.: पाच वर्ष थांब कळेल तुला
सेवक : या आधीचे राजे पण असेच बोलले होते ..पण काय झालं नाही जी पाच वर्षात..आमच्या तीन पिढ्यांनी काम केले जी या राजवाड्यात..कोणालाच विकास दिसला नाही..
विपु.: बरं बरं..ते जाऊदे..तू माझी बॅग भरून  ठेव आज..संध्याकाळी दौऱ्यावर निघतोय मी.
सेवक : हो जी भरून ठेवतो..दौरा कुठे आहे म्हणायचा ?
विपु.: युगांडा..!
सेवक : कुठ आलं जी हे ?
विपु.: अरे वेड्या..आफ्रिका खंडात आहे हा देश..६५ वर्षात आपल्या देशातून कोणीही भेट दिली नाही तिथे..
सेवक: ६५ वर्षात आमच्या खेड्याला बी कोणीच भेट दिली नाही जी..
विपु.: अरे खेड्यांचाच विकास करायचा आहे मला..
सेवक : युगांडात जाऊन ?
विपु.: अरे युगांडात झिर्कोनियम चे साठे सापडले आहेत..झिर्कोनियम स्वस्तात आयात करून खेड्यापाड्यात पोहोचवायचा आहे मला.
सेवक : हे काय असते जी ?
विपु.: झिर्कोनियम माहिती नाही तुला !! अणुउर्जा निर्माण होते झिर्कोनियम वापरून.
सेवक : हुजूर खेड्यापाड्यात काय करायची आहे अणूउर्जा ? त्या झिर्कोनियमपेक्षा पाणी पोहोचावा हो आमच्या खेड्यात..कास्तकार खुश होतील..
विपु.: तूझ्याशी बोलून काही उपयोग नाही. तुला काहीच कळत नाही.
सेवक : माफी असावी हुजूर...विकास जरूर करा तुम्ही देशाचा..पण झिर्कोनियम पिऊन तहान नाही भागत जी  देशाची..तिथे पाणीच लागते..अणूउर्जा खाउन पोट नाही भरत जी..तिथे भाकरीच लागते..इथे जो येतो त्याच्या स्वप्नातला देश घडवू पाहतो..पण जनतेच्या स्वप्नांकडे कोणी बघायला पाहिजे ना जी..जनतेला स्वप्न पाहणं बी परवडेना झालंय हुजूर..
विपु.: अरे काय बोलतो आहेस तू ? कालपर्यन्त ही परिस्थिती होती हे मान्य..पण आम्ही आल्यापासून 'चांगले दिवस' येतायेत जनतेसाठी.
सेवक : चांगल्या दिवसाचं कसं असतं ना हुजूर...त्याची वाट बघता बघता जनता जे आहे त्यालाच चांगलं मानायला लागते.
विपु.: पालथ्या घड्यावर पाणी ओततोय मी मगापासून. तू जा..सगळे आलेत का बघ दरबारात?
सेवक : आलेत की हुजूर..सगळा दरबार भरलाय कधीचा..
विपु.: अरे मग मी इथे काय करतोय ?
सेवक : विकास करताय !

विकासपुरुष तावातावाने दरबाराकडे निघाले. दरबारात स्थानापन्न झाल्यावर त्यानी सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकला.
विपु.: आजच कामकाज सुरु करा.
सेनापती: हुजूर शेजारी राष्ट्राने सीमेवर पुन्हा कारवाया सुरु केल्या आहेत. आपली आज्ञा असेल तर ....
विपु.: नाही ! युद्ध सुरु होईल असं काहीही करू नका.
सेनापती: मग काय करायचं हुजूर ?
विपु.: तिथल्या बादशहाच्या मातोश्रींना साडीचोळी पाठवा. आणि त्यांच्या क्रिकेट संघाला आपल्या इथे खेळायला बोलवा.
सेनापती: हुजूर पण सीमेवर आपले जवान....
विपु.: तुम्हाला परदेशनीती कळत नाही सेनापती...युद्ध तोच जिंकतो जो तह जिंकतो !
सेनापती: पण त्यासाठी युद्धाची सुरवात तर व्हायला हवी ना ?
विपु.: क्रिकेटच्या मैदानावर युद्ध होऊ द्या..तह आपण बादशाहाशी करू. त्यांनाही बोलवा सामना बघायला.
सेनापती: मागच्याही वेळी आपण हा प्रयत्न केला होता पण....
विपु.: आता या विषयावर चर्चा पुरे..पुढला मुद्दा घ्या.
खजिनदार : हुजूर..काही केल्या महागाई नियंत्रणात येत नाहीये. जनता त्रस्त आहे.
विपु.: तुमच्याजवळ काही उपाय आहे का यासाठी ?
खजिनदार : हुजूर..तेल स्वस्त झालं तर बाकी गोष्टीही स्वस्त होतील.
विपु.: अरब सुलतानाला फोन करा..आम्ही येतोय म्हणून सांगा.
उद्योगमंत्री: माफी असावी हुजूर..पण त्यापेक्षा आपल्याच देशातील तेलसाठे शोधलेत तर उत्तम होईल.
विपु.: मनातलं बोललात..गौतम राजेंची जहागीरी असलेल्या कच्छच्या रणात तेलसाठे असण्याची शक्यता आहे. त्यांना खोदकामाला परवानगी द्या. आणि काय लागेल ते अर्थसहाय्य द्या.
उद्योगमंत्री: हुजूर पण तिथे साठे नाही सापडले तर ?
विपु.: तर तिथे स्मार्ट सिटी वसवू...विकास तर होणारच!
उद्योगमंत्री: हुजूर..राजस्थानच्या वाळवंटात तेलसाठे सापडू शकतात. आणि अरबी समुद्रात सुद्धा !
विपु.: काय सांगता..लगेच खोदकाम चालू करा. राजस्थानातून जामनगरला पाईपलाईन टाकण्यासाठी निविदा बोलवा. नीताबेनला समाजकार्यासाठी जामनगर दत्तक घ्यायला सांगा.
उद्योगमंत्री: पण हुजूर..एवढ्या मोठ्या कामासाठी मनुष्यबळ कुठून येणार ?
विपु.: त्यात काही विशेष नाही..उत्तरप्रदेश आणि बिहारचे - जिल्हाधिकारी गुजरातला आणा..मनुष्यबळ आपोआप येते.
उद्योगमंत्री: पण उत्तरप्रदेशात - महत्वाचे प्रकल्प सुरु करा असं सुचवणार होतो.
विपु.: सध्या राहूद्या..तिथल्या निवडणुका झाल्यावर बघू !
कृषीमंत्री: देशात दुष्काळ परिस्थिती……
विपु.: दरबार आता बरखास्त करा..आम्ही युगांडावरून आल्यावर बोलू.
दरबार बरखास्त!

--चिनार

Wednesday 27 May 2015

शेतातला एक दिवस...

'संसदेतला एक दिवस ' ह्या माझ्या आधीच्या लिखाणाचा दुसरा भाग म्हणून हा कल्पनाविस्तार प्रकाशित करत आहे.

युवराजांनी आता मनाशी पक्कं ठरवलं की काहीही झालं तरी जनतेतली आपली प्रतिमा सुधारायची. जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा.ते प्रश्न सोडवून जनतेचा हिरो बनायचं. पण त्यांना नक्की सुरवात कोठून करावी हे कळत नव्हतं. या विचारात असतानाच कुठेतरी त्यांच्या वाचनात आलं की , भारत हा कृषीप्रधान देश आहे. पंतप्रधान आणि कृषीप्रधान ह्या दोन शब्दात त्यांना काहीतरी साम्य जाणवल्यामुळे त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. ते शेवटी मातोश्रींकडे गेले.
युवराज : आई आपला देश कृषीप्रधान आहे ना?
मातोश्री : हो रे बाळा..काय झालं?
युवराज : कृषीप्रधान म्हणजे काय ?
मातोश्री : अरे देशातली जनता प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. शेती म्हणजेच कृषी. आपल्याही परिवारात जुन्या काळी कोणी ना कोणी शेती केली असेलच.
युवराज: हो हो...आत्ता आठवलं..आजोबा-पणजोबा नेहमी म्हणायचे..भारत देश म्हणजे आपल्यासाठी शेतजमीनच आहे..जनतेने पेरायचं अन आपण खायचं..
मातोश्री : अरे परमेश्वरा..!!

शेवटी युवराजांनी कृषी म्हणजेच शेती या विषयाचा अभ्यास करायचं ठरवलं. लगेच त्यांनी जवळपासच्या एक दोन गावात कृषी दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले. ठरल्याप्रमाणे युवराज एका  गावात पोहोचले. तिथे दोन -चार शेतकरी त्यांना दिसले.
युवराज : आपला देश हा कृषीप्रधान देश आहे ! जय जवान जय किसान !
शेतकरी : काय झालं मालक ?
युवराज : आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. अवकाळी पावसाने झालेले नुकसान सरकारला भरून द्यावेच लागेल. आम्ही त्यासाठी आंदोलन करू.
शेतकरी : मालक..गेल्या २ वर्षापासून इथे पाऊसच पडला नाही.
युवराज : तरीपण दुबार पेरणीचे पैसे सरकारला द्यावेच लागतील.
शेतकरी : मालक..यावर्षी अजून एकदाही पेरणी झालेली नाही.
युवराज : काय म्हणता ?...काळजी करू नका ,आम्ही शेतमालाला योग्य भाव मिळवून देऊ ?
शेतकरी : मालक अजून गेल्या २ वर्षांचे पैसे मिळाले नाही.
युवराज: तुमच्या अजून काही समस्या असतील तर मला सांगा. मी त्या सोडवेन. गेल्या ६० वर्षांपासून शेतकऱ्यांचा मित्र अशीच ओळख आहे आमची. ह्या नवीन सरकारने वाटोळे केले आहे तुमचे. भारत हा कृषीप्रधान देश आहे...
शेतकरी : बरं बरं मालक...कळलं आम्हाला..तेवढं पेमेण्टचं बघा..
युवराज: हो..मी लगेच कृषीमंत्र्यांना सांगतो. बाय द वे..कश्याची शेती करता तुम्ही ?
शेतकरी : सोयाबीन लावतो मालक..आणि कपास पन..
युवराज:  अरे वा..म्हणजे बागायती शेती..चांगलंय..
शेतकरी : नाही हो मालक..कोरडवाहू..ऊस ,गहू  म्हणजे बागायती..
युवराज:  गहू का नाही लावत तुम्ही?
शेतकरी: दुष्काळी भागात गहू कसा लावणार मालक..पाणी लागते भरपूर
युवराज:  अहो..दुष्काळ दरवर्षी एकदाच पडतो ना..दुष्काळ पडायच्या आधीच लावायचा ना !!!
शेतकरी : धन्य आहात मालक तुम्ही !
युवराज:  आणि तुम्ही धनधान्य आहात ..कारण भारत हा कृषी......!
शेतकरी : अरे कोणी आवरा रे ह्याला...

नंतर युवराजांनी शेतीची पाहणी करायचे ठरवले. जवळच्याच एका शेतजमिनीवर ते गेले. चपलेतून सुद्धा त्यांना काटे - खडे टोचत होते. तरीपण युवराज चालत राहिले. त्यांच्या सोबत पाच-पन्नास कार्यकर्ते, शेतकरी वैगेरे होतेच. एका ठिकाणी थांबून त्यांनी थोडी माती उचलली.
शेतकरी: काय झालं मालक ?
युवराज: हा पहा सविनय कायदेभंग!
शेतकरी: म्हणजे काय ?
युवराज:भूसंपादन कायदा आम्ही होऊ देणार नाही.
शेतकरी: ठीक आहे..नका होऊ देऊ..पण माती का उचललीत मालक?
युवराज: हीच माती नेउन मी सत्ताधाऱ्यांना दाखवणार..त्यांना विरोध करणार..
शेतकरी (मनात) : आणि माती खाणार...!
शेतकरी: मालक काही वर्षांपूर्वी तुमच्या सरकारने हाच कायदा आणायची तयारी केली होती. तुमचं सरकार गेलं आता ह्याचं आलं..आम्हाला काय फरक पडला..शेतकऱ्याला काय फरक पडतो शेवटी ?
युवराज: काय सांगता ?...मी कुठे होतो त्यावेळी ?
शेतकरी (चिडून) : मालक..तुम्ही तेंव्हाही माती खात होतात..आताही माती खात आहात!

हे ऐकून युवराज स्तब्ध झाले. वापस आल्यावर ते तडक पंतप्रधानांना भेटायला गेले.
युवराज: परत एकदा..परत एकदा सूडाच राजकारण खेळताय तुम्ही.
पंतप्रधान: काय झालं युवराज ?
युवराज:आमचाच कायदा परत आणताय..शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा डाव  आहे तुमचा !
पंतप्रधान: त्यावेळी तुमचा काय डाव होता युवराज ?
युवराज: जमिनी हडपण्यासाठी आम्हाला कायद्याची गरज कधीच नव्हती..प्रत्येक कार्यकर्त्याला एकरानी जमिनी वाटल्यात आम्ही..
पंतप्रधान: त्याच जमिनी परत मिळवण्यासाठी हा कायदा आहे युवराज..
युवराज: पण मोबदल्याच काय ?..भारत हा कृषीप्रधान ......
पंतप्रधान: अरे कोणी आवरा रे ह्याला...!!

-- चिनार