Tuesday 28 February 2017

#हॅशटॅग#

"भाऊ..तुले एक विचारू का?"

"विचार ना बे."

"तू फेसबुक वर हायस नं?"

"हो मंग..माया पोस्टा नं फोटो दिसत नाय का तुले?"

"अन टिवटर वर?"

"टिवटर नाय बे ट्विटर."

"हा तेच ते"

"बरं मंग?"

"ते फेसबुक नं टिवटरवर, दोन आडव्या अन दोन तिरप्या रेषा काय असतेत?"

"काय?"

"अरं ते असते ना..दोन आडव्या अन दोन तिरप्या रेषा काढून त्याच्यासमोर लिहितेत सारे?"

"काय बोलून ऱ्हायला बे?"

हातावर आकृती काढून…..#
"हे पाय असं असते ते?"

"हा...ह्याला हॅशटॅग म्हन्तेत?"

"काय म्हन्तेत?"

"हॅशटॅग..हॅशटॅग."

"म्हंजे काय पन?"
"मले काय मालूम बे?"

"अबे मंग त्वां कायले लिहितं? #दादाचं लग्न #वावरात पंगत #जिलबी नं बुंदी?"

"ते तसंच लिहा लागते ना बे ट्विटरवर."

"पन काऊन? दादाच्या लग्नात पंगतीत संन्न जिलब्या हानल्या असं काऊन लिहत नाही."

"अबे पद्धत ऱ्हायते ना लिहिण्याची एकेका ठिकाणची."

"मले नाही समजू ऱ्हायलं बा?"

"हे पाय..आपल्याले एखांदी गोष्ट ठासून सांगायची असंन तं हॅशटॅग द्या लागते ट्विटरवर."

"म्हंजे मास्तरनं शाळेत ते उद्गारवाचक चिन्न शिकवलं होतं तसं?"

"हा तस्संच!"

"पन समोरच्याले कसं कळनं?"

"काऊन नाय कळणार?"

"म्हंजे पाय त्वां लिहिलं #दादाचं लग्न #वावरात पंगत #जिलबी नं बुंदी...बराबर?

"हा मंग?"

"ह्याचा काय अर्थ होते?"

"दादाच्या लग्नात बम्म जिलब्या सुतल्या..अन बुंदी पन!"

"नाही ना?"

"काऊन..दुसरा काय अर्थ होते?"

"दादाच्या लग्नात, पंगतीत बम्म जिलब्या वाढल्या असा पन अर्थ निंगते ना?"

"तू जाय बे...मजाक उडवतं का मायी?"

"तसं नाय भाऊ..उदाहरण देल्लं फक्त."

"लय शायना हायस तू?"

"नाय भाऊ..हे तर मराठी झालं..इंग्लिशमदे बी कायच्या काय लिहितेत ना सारे."

"काय लिहितेत?"

"आता हे पाय...#dayoff #leginjury #sitting@home #relaxed"

"मंग बराबर तं हाय. तेच्यात काय चुकलं आता? पाय मोडला म्हणून घरी बशेल हाय तो."

"अबे त्याचं तंगडं मोडलं म्हणून काय इंग्लिशचं बी मोडायचं का? पार आय माय करून टाकतेत इंग्लिशची!!"

"तू काऊन चीडतं पन?"

"तसं नाय भाऊ..पन आपले खेड्यापाड्यातले पोट्टे पुन्यामुमैले जाते तवा त्यायच्या इंग्लिशची कशी मजा उडवतेत तिथले पोट्टे!! अन आता हे कसं चालते?"

"ते वेगळी गोष्ट हाय ना बे."

"वेगळी कस्काय? आपले पोट्टे तरी चारचौघात चुकीचं बोलतेत बिचारे..हे तर साऱ्या दुनियेले बोंबलून सांगू ऱ्हायले."

"बराबर हाय तुय..पन ते कसंय..बा एखांदी महत्त्वाची घटनागिटना एखाद्याले सांगायची असंनं तं हॅशटॅग लावला की साऱ्याइचं लक्ष जाते."

"अबे तं ह्याच तंगडं कोणतं युद्धात जाऊन मोडलं होतं बे?मोरीत पाय घसरून पडला असंनं थो. कायले हॅशटॅग लावा लागते?"

"पन तुयी काऊन जळू राहिली येवढी? त्यांले काय लिहाच ते लिहीतीन."

"अजून एक विचारू का तुले?"

"हा विचार"

"ते LOL अन ROFL म्हंजे काय?"

"ते हासायाचं असलं की LOL किंवा ROFL लिहा लागते."

"ते मले बी माहिती हाय."

"मंग कायले विचारतं?"

"त्यादिवशी एका पोट्टीनं लिहिलं #feelingsleepy. मले ते वाचून हसू आलं. मंग म्या बी लिहिलं lol..तं ते पोट्टी मायावरचं डाफरली."

" काऊन?"

"म्या मराठीत लिहिलं ना बे... लोळ !!!!"
"मंग डाफरणारच ते..तिले झोप आली तं तू लोळ म्हणतं!!"

"माय चुकलं ना भाऊ मराठीत लिहिलं ते...मानतो ना मी..पन  झोप आली तं लोळ नाही तं काय पळ म्हनाचं का?"

"अबे पन तुले लिहाची गरजच काय होती?"

"मंग तिले तरी लिहाची काय गरज होती बे? झोप आली तं ओरडून कायले सांगा लागते?"

"हे पाय तू फालतू होबासक्या करू नको फेसबुकवर. आनशीन घरावर गोटे."

"मायबीन लोकं होबासक्या करतेत एवढ्या ते चालते. अजून एक विचारायचं होतं मले."

"आता काय ऱ्हायलं अजून?"

"आता समजा मले एखांदी फ्रेंड रिक्वेष्ट आली. तं तिले इग्नोर मारताना समोरच्याले दोन-चार शिव्या पाठवायची व्यवस्था हाय का? किंवा मायी फ्रेंड रिक्वेष्ट एखाद्यानं इग्नोर मारली तं त्याले तरी शिव्या द्यायची व्यवस्था पाह्यजे की नाही?"

"शिव्या काऊन द्यायच्या हायेत पन तुले?"

"अबे काही लोकांचे फोटो पाहूनच थोबाडीत द्यावीशी वाटते ना बे...वरतून ते फेसबुक दहावेळा विचारते..व्हॉट' ऑन युअर माईंड?"

"मंग त्याच्यासाठी हॅशटॅग वापर ना बे?"

"त्यानं काय होईन?"

"शिवी देल्ली हे बाकी कोणाला कळणारच नाय ना."

"म्हंजे?"

"हे पाय #tuyananachitang #bhaitadbongya #chalningithun !!!"

"हे जमलं ना भाऊ...बरं येतो मंग मी"

"कुठं चालला आता?"


"#मीकुठंबीजाईन #तुलेकायकरायच !!!"

Sunday 26 February 2017

फोनाफानी...

"हालो ...बापूसायब बोलून ऱ्हायले का जी ?
"हा मंग...कोन बोलून ऱ्हायलं? "
"आहो मी....मी पद्मा बोलून ऱ्हायली"
"पद्मा?" बापुसायबाले कायबी टोटल लागेना.
"वळखलं नाय का?"
"आवाज वळखीचा हाय पन आठवू नाय ऱ्हायला."
"अवं मी भौसायबाची सून..तुमी नाय का त्यादिवशी घरी आल्ते?"
"हा हा ...बोला सुनबाई ..आत्ता आलं ध्यानात."
आता भौसायबाची सून आपल्याला कायले फोन करू ऱ्हायली ते बापुसायबाले  कळेना..
"बापूसाहेब येक अडचण व्हती. मदत करसान का?"
"सांगा की सुनबाई. अवं हक्क हायं तुमचा.भौसायबाची सून म्हंजे आमचीबी सून."
"आता काय सांगावं ..मामंजी अन हे गेले गावाले हप्ताभरासाठी. अन हिकडं आम्ही अडचणींत पडलो."
"कायची अडचण. सांगा तं येक डाव."
"आवं म्या घरी येकलीच हायं. अन हे सारे वावरातले मजूर आले हिथं पैसे मागाले."  
"काह्यचे पैसे?"
 "आवं ते कायतरी नोटबंदी केली म्हन्ते ना सरकारनी. या मजुराईले त्याईचे पैसे पायजे म्हन्ते सारे. आता मी कुटून देनार. पन्नास हजार हायेत साऱ्यायचे मिळून."
"बरं मंग आता?"
 "मले तं कैच समजू नाही ऱ्हायलं? ह्यांले फोन केल्ता तं म्हने तुमाले फोन करून मागून घे सद्याचे. ते वापस आले की बातचं देतील म्हने तुमचे पैसे. येवढी मदत करान का बापूसायब? लागनं तं हे फोन करतीनं तुमाले."

बापुसायब विचार करू लागले. अन येकदमच त्येच्या चेहऱ्यावर खुशी झळकू लागली. दोन दिवसापासून बापुसायब चिंतेत व्हते. नोटबंदीच्यान त्यायच्या बी खुट्या लटकेल व्हत्या. वाड्यातले धा लाख कुठं ठेवावं त्यांले समजत नव्हतं. त्यातल्या पन्नास हजाराची सोय झाली व्हती.

"आवं काय सुनबाई..हे काय विचारनं झालं? आपलंच घर हायं हे. पैसे घ्यायले येता की मानुस पाठवू तेव्हढं सांगा फकस्त."
"लय उपकार झाले बापूसायब. म्या पाठवते मानसाले."
"काह्यचे उपकार सुनबाई..भौसायब आमचे दोस्त !! त्याईले नाहीतं कोनाले मदत करनार. पाठवा मानसाले.अन ते पैसे परत द्यायचं का न्हाय ते मी अन भौसायब पाहू. तुमी नका टेन्शन घेऊ."

बापुसायबानी फोन ठेवला. त्यांले जरा बरं वाटू लागलं. आता अशेच दोन-तीन बकरे सापडले का त्यांचं काम व्हनार व्हतं. दोन मिनिटात फोन परत वाजू लागला. मगाचाच नंबर व्हता.

"हालो"
"हालो बापुसायब..मी पद्मा बोलू ऱ्हायली"
"हा बोला सुनबाई..काय झालं?"
"ह्यांले फोन केल्ता बापूसायब..त्यायनं लयडाव आभार मानले तुमचे."
"आवं काय सुनबाई."
"बापुसायब..त्याईनं तुम्चावाला तो बॅंकेतला नंबर असते का न्हाई, तो मागायले सांगतला. आल्यावर चेक फाडून देतो म्हने लगेच."
"आवं राहूद्या सुनबाई. मी बोलन नंतर भौसायबाशी."
"आवं बापूसायब..मी बायमानूस काय बोलनार त्येंच्यासमोर. तुमी देऊन टाका जी मले नंबर.नायतर चिल्लावंतीन मायावर."
"बरं. मी देतो तुमाले. मॅसेज पाठवू काय तुमच्या फोनवर."
"ते मले नाय ना समजत..तुमी पाठवा, म्या देईल त्यांले आल्यावर."
"बरं..पन मले सांगतल्याशिवाय चेक फाडू नका म्हना त्याले."
"हांव"

बापुसायबानी फोन ठिवला. अन मॅसेज पाठवून देल्ला अकाऊंट नंबरचा.

सातेक मिनिटं झाले असतीनं तं फोन परत वाजला.
बापुसायबानी फोन हातात घेतला तं बँकेचा मॅसेज आल्ता.
"प्रिया ग्राहक, तुमच्या xxxxxxxxxxxxxxxxx या खात्यामध्ये रु.५००००० नगद जमा झाली आहे."

बापुसायबाले काहीच समजेना. थोडं शुद्धीत आल्यावर त्याईनं भौसायबले फोन लावला.
"हे काय केलं भौसायब तुमीनं?"
"काय झालं बापूसायब?"
"आवं तुमच्या सुनबाईचा फोन आल्ता मले आत्ता पैसे मागायला. अन आता...."
"आमच्या सुनबाईचा??...कायतरी गलती होत आसन बापुसायब. आमच्या सुनबाई माहेरी हायेत बाळंतपणासाठी. त्या कायले तुमाले फोन करतीनं ??"


बापूसायब गपकनं जमिनीवर बसले.

Friday 3 February 2017

राख !

स्मशानातील गर्दी आता सरली होती.पण आजच्या घटनेमुळे, चिरनिद्रेत विश्रान्ती घेणाऱ्या जनाबाईचा आत्मासुद्धा दोन क्षण का होईना पण सुखावला असेल..............
*************************************************************************************
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या त्या आश्रमात पहाटे चार वाजता हलकल्लोळ माजला होता. त्याला कारणही तसंच होतं. आश्रमात एका साध्वीचा अचानक मृत्यू झाला होता. काही वेळापूर्वी साध्वीच्या खोलीत आगेच्या ज्वाळा दिसल्याने आश्रमातले सगळे तिकडे धावले. पण आग लागल्याचे उशीरा लक्षात आल्याने आता काहीही उपयोग नव्हता. पाण्याने आग विझवण्यात आली पण आता खोलीत केवळ साध्वीच्या शरीराची हाडं आणि राख उरली होती. आता पोलिसांना बोलावणाशिवाय पर्याय नव्हता. थोड्याश्या नाखुशीनेच पण नाईलाज म्हणून आश्रमप्रमुखांनी पोलिसांना पाचारण केले. प्राथमिक तपासावरून साध्वीने आत्महत्या केली असे दिसत होते. कारण आग लागण्यासाठी कुठलाही ज्वलनशील पदार्थ खोलीत नव्हता. शॉर्ट सर्कीट वगैरे भानगडसुद्धा वाटत नव्हती. पण पोलिसांसमोर दोन प्रश्न होते. एक म्हणजे, फक्त हाडं आणि राख यावरून मृत्यू झालाय हे कसं ठरवायचं ? आणि एकवेळ ते जरी मान्य केलं तरी आगपेटी,रॉकेल असं काहीही जवळपास नसताना आग लागली किंवा लावली तरी कशी ?
"साध्वीने आत्मदाह तर केलं नसेल ?", कोणीतरी कुजबजलं.

झालं ! साध्वीच्या आत्मदाहाची बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली. आश्रमासमोर एकचं गर्दी लोटली. आत्मदाह म्हणजे काय असं प्रश्न लोकं दबक्या आवाजात विचारू लागले. काही धर्मगुरूंनी आत्मदाह विषयावर लगेच वक्तव्य द्यायला सुरु केलं. एका योगगुरूने तर," योगशक्तीने आत्मदाह संभव!" हे बोलून खळबळ माजविली. दुपारी बारा वाजेपर्यंत देशभरात बातमी पोहोचली होती. साध्वीला संतपद देण्याची चर्चा सुरु झाली. तिच्या देहाचे अवशेष अंत्यसंस्कारासाठी सुपूर्द करण्यासाठी पोलिसांवर दबाव आला. नाईलाजाने पोलिसांनी ते सुपूर्द केले पण तपास चालूच ठेवला.
संध्याकाळी सहा वाजता, स्मशानात हजारोंच्या उपस्थितीत समाजातील मोठ्या व्यक्तींच्या हातून साध्वीचे अंत्यसंस्कार पार पडले.
*******************************************************************************
त्या शहरापासून अंदाजे तीनशे किमी दूर असलेल्या गावातल्या एका लॉज मध्ये तो तिला घेऊन पोहोचला. ती जरा घाबरली होती.
"सुटलो एकदाचे", तो म्हणाला.
"पकडल्या गेलो तर", ती म्हणाली.
"काहीही होणार नाही. आपण निसटलोय ! आता फक्त तू आणि मी !," असे म्हणत त्याने तिला जवळ घेतले.
******************************************************************************
तीन-चार दिवसांपूर्वी मरणासन्न अवस्थेत असताना जनाबाई आपल्या नशिबाला दोष देत होती. आयुष्यभर लोकांची घरातील धुणी-भांडी करता करता जनाबाई चार पैसे तर जोडू शकली नाहीच पण म्हातारपणी आधार देतील अशी चार माणसंसुद्धा जमवता आली नाहीत ह्याची तिला खंत होती. आता मेल्यावर 'चार खांदे' तरी गोळा होतील का ह्याविषयी ती साशंक होती. शेवटी व्हायचे तेच झाले. झोपडीत मृतावस्थेत सापडलेल्या जनाबाईच्या देहाला म्युनीसीपाल्टीच्या गाडीने स्मशानात पोहोचवले. तिसऱ्या दिवशीसुद्धा जनाबाईचं 'तिसरं' करायला कोणीही आलं नाही. अर्थात मेल्यानंतर जनाबाईला ह्या गोष्टीने काहीही फरक पडत नव्हता.
रात्र झाल्यावर स्मशानाचा रखवालदार झोपायला गेला. मध्यरात्री खुडबुडीने त्याला जाग आली. पण मढ्यावर नेहमीप्रमाणे कुत्रं  चढलं असेल ह्या विचाराने तो परत झोपी गेला. त्याचा अंदाज काही फार चुकला  नाही. कुत्रंच होतं पण पिसाळलेलं आणि मानवी रुपातलं ! वीस-बावीस वर्षाचं एक पोरगं धडपडत मढ्याच्या ओट्यापाशी आलं. चिता शांत झाली असली तरी धग अजूनही कायम होती. तो दुसऱ्या ओट्यापाशी आला. जनाबाईच्या देहाची हाडं आणि थोडी राख त्याने जवळच्या पोत्यात भरली. आणि तिथून पसार झाला. आजच्या रात्रीत अजून त्याला बरीच कामं पार पाडायची होती!
********************************************************************************
बऱ्याच वेळ त्याच्या कुशीत झोपल्यावर तिला जाग आली. डोके जड झाले असले तरी आपण स्वतंत्र झालोय ह्या भावनेमुळे  तिला मोकळे वाटत होते. एव्हाना त्यालाही जाग आली होती.
तेव्हढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला. दरवाज्यावर पोलिसांना बघून दोघेही घाबरले !
********************************************************************************
पण  आजच्या घटनेमुळे, चिरनिद्रेत विश्रान्ती घेणाऱ्या जनाबाईच्या देहाची राखसुद्धा मनात सुखावली होती........कारण 'चार खांद्यांची' तिची अंतिम इच्छा चार हजार खांद्यांनी पूर्ण केली होती !!
****************************************************************************
समाप्त

(सत्यघटनेवर आधारित)