Thursday 2 May 2019

सरफरोश...




सरफरोश सिनेमाला वीस वर्ष पूर्ण झाल्याचे वाचनात आले. साहजिकच वीस वर्षांपूर्वी आपण काय करत होतो हा विचार डोक्यात आला. पण त्यात काही विशेष सांगण्यासारखं नाही. आणि आणखी वीस वर्षांनी हा प्रश्न पडल्यावरही उत्तर हेच असणार ह्यात शंका नाही. असो.

तर ९९ साली सरफरोश रिलीज झाला त्यावेळी मी आठव्या वर्गाची वार्षिक परीक्षा दिली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच सुरु झाल्या होत्या.टीव्हीवर सरफरोशचं ट्रेलर बघितल्याचं मला पक्कं आठवतं. ट्रेलरमध्ये आमिरचे वडील त्याच्या  कपाळावर  टिळा लावतात तो प्रसंग आवर्जून दाखवयाचे. आता त्यादरम्यान  (आणि त्यानंतरही!) देशभक्तीपर सिनेमाचं बॅटन सनी देओलच्या हातात होतं. आणि सनीच्या सिनेमात ह्या असल्या प्रसंगांची काही कमी नव्हती. त्यामुळे सरफरोशच्या ट्रेलरमध्ये विशेष असं काही वाटलं नाही.शिवाय त्यावेळी सिनेमाचं फारसं आकर्षण नव्हतं. आणि आलेला प्रत्येक सिनेमा पाहण्याची मुभासुद्धा नव्हती. ह्या आणि इतर असल्याचं कारणांमुळे मी त्यावेळी सरफरोश थियेटरमध्ये जाऊन पाहिला नाही.सरफरोशसारखे बरेच सिनेमे या ना त्या कारणाने थिएटरमध्ये बघायचे राहून गेलेत. त्यात प्रामुख्याने बॉर्डर, सत्या, दिल सें, मिशन काश्मीर आणि रेहना है तेरे दिल में चा मी आवर्जून उल्लेख करेल.  आता हे सोडून काही सिनेमे मी थिएटरमध्ये का पाहिलेत ह्याचीही लांबलचक यादी आहे.

नंतर काही महिन्यांनी सरफरोश व्हिडीयो सिडी भाड्याने आणून पाहिला. आणि खरं सांगतो समजलाच नाही. कोण बाला ठाकूर, कोण वीरन, कोण सुलतान..आणि त्याचा नसिरुद्दीन शहाच्या गुलफाम हसनशी काय संबंध?
अरे किती किचकट आहे हे सगळं. तेंव्हापर्यंत आम्ही पाहिलेल्या सिनेमात काय असायचं.तर एक प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर, त्याची हिरोईन आणि खलनायक म्हणून  गावातला एक गुंडा किंवा भ्रष्ट राजकारणी. मग तो खलनायक सिनेमाभर हिरोवर अत्याचार करणार. आणि शेवटी हिरो त्याला धोपटणार. इतकी साधी सरळ मांडणी. अगदी आदल्या वर्षी आलेल्या आमीरच्याच गुलामची कथासुद्धा अशीच होती. (गुलामचं वेगेळेपण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे). पण सरफरोश वेगळाच होता. आणि तो समजून घेण्याची उमज तेंव्हा नव्हती.
यथावकाश सरफरोश वारंवार बघण्यात आला. हळूहळू समजला आणि नंतर अंगात भिनला. गेल्या वीस वर्षात सरफरोश किती वेळा बघितलाय ह्याची गणतीच नाही. आजही तो टीव्हीवर दिसला की चॅनेल बदलल्या जात नाही. पण आजकाल ते यू टीव्हीवाले सरफरोश असा हायलाईट्स दाखवल्यासारखा का दाखवतात कळत नाही.
असो.

सिनेनिर्मितीच्या वेगवेगळ्या पातळींवर सरफरोश हा एक उत्कृष्ट सिनेमा होता. सगळ्यात आधी येते ती सरफरोशची कथा आणि पटकथा. सरफरोशची कथा वरकरणी एका पोलीस तपासाची कर्मकहाणी इतकी साधी वाटत असली तरी प्रचंड गुंतागुंतीची आहे. इतक्या घटना आणि व्यक्तिरेखा पटकथेत बांधणं म्हणजे खायचं काम नव्हे. माझ्यासारख्या नवख्या लेखकासाठी सरफरोशची पटकथा म्हणजे एक कार्यशाळा आहे. कुठल्याही व्यक्तिरेखेवर अन्याय न होऊ देता आणि त्याच वेळी ती व्यक्तिरेखा डोईजड होणार नाही ह्याची पुरेपूर खात्री ह्या पटकथेत घेतली आहे. उदाहरणादाखल आमिरची एसीपी राठोड म्हणून एन्ट्री होते तो प्रसंग बघा..इथे एक रिमांडमध्ये घेतलेला नगरसेवक आमिरची वाट बघत बसला असतो. तो हवालदारावर ओरडून म्हणतो,
"अबे बूला तेरे एसीपी राठोड को . मैं यहा पुरे दिन बैठने नही आया हू"
ह्या माणसाचं कथेत पुढे काहीच काम नाही. पण या छोट्या प्रसंगातून  एकदंरीत सगळ्याच छोट्यामोठ्या नेत्यांची गुर्मी आणि आमीर त्याला ज्या सहजतेने धडा शिकवतो त्यावरून एसीपी राठोड काय चीज आहे ही बाब उत्तम पद्धतीने समोर येते. दुसरं उदाहरण मकरंद देशपांडेच्या शिवा ह्या व्यक्तिरेखेचं. हा शिवा पोलिसांच्या तपासात सतत व्यत्यय आणत असतो. त्यात कस्टडीत घेतलेल्या एखाद्या गुन्हेगाराला मारणं, एखाद्याला गायब करणं वगैरे गोष्टी येतात. शिवा ऐनवेळी कुठून येतो आणि कुठे जातो हे कोणालाच कळत नाही. शिवाला फारसे संवादही नाही. पण एका प्रसंगात तो सुलतानला म्हणतो, "अपन को भाई जितना अक्कल नही है. पर कभी कभी लगता है अपना पेहलेवाला धंदा ही अच्छा था. ड्रग्स का.."  गुन्हेगारीच्या अथांग समुद्रात  शिवा ही एक छोटीशी मासोळी असते. आणि वाटत नसलं, तरी ह्याची त्यालाही पूर्ण कल्पना असते. सरफरोशच्या पटकथेत अश्या कितीतरी गोष्टी सहज मांडल्या आहेत. मतलबी मिरची सेठ, सगळ्या प्रकारात बळीचा बकरा बनलेला सुलतान ह्या सगळयांना पटकथेत स्वतंत्र अस्तित्व आहे.

इन्स्पेक्टर सलीम ही सरफरोश मधली सगळ्यात लक्षवेधी भूमिका आहे. आणि त्यासाठी मुकेश ऋषीहुन योग्य अभिनेता मिळालाच नसता. नोकरीच्या ठिकाणी धर्मामुळे सतत डावलल्या गेलेला आणि सगळ्यांच्या डोळ्यातला तिरस्कार पचवून इमानेइतबारे नोकरी करणारा इन्स्पेक्टर सलीम मुकेश ऋषींनी मनापासून साकारला आहे. एखाद्या सामान्य पटकथेत, एसीपी राठोडचा असिस्टंट म्हणून कोणीतरी हवा म्हणून एखादी दुय्यम दर्जाची भूमिका सहज लिहिता आली असती. आणि सरफरोशच्या मुख्य कथेत त्याने काही फ़ारसा फरक पडला नसता. पण सलीमची भूमिका विचारपूर्वक लिहिण्यात आली आहे. आणि त्यानेच ही पटकथा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. एका विशिष्ट धर्मातील लोकांकडे सतत त्या विशिष्ट नजरेनेच बघण्याच्या प्रवुत्तीला सलीम छेद देतो. एका प्रसंगात एसीपी राठोडने सलीमला चिडून म्हणतो,
"सलीम ये मेरे मुल्क का मामला है."
"तो क्या मेरे मुल्क का नही है?"
"शायद नही है", एसीपी राठोड उत्तरतो.
या वाक्यानंतर सलीमच्या डोळ्यातले भाव पाहावे. जबरदस्त ! अपमानाचे दु:ख आणि चीड ह्याचं सुरेख मिश्रण. नंतरच्या एका प्रसंगात सलीम एका कट्टरतावाद्याला मुसलमान शब्दाचा अर्थ सांगतो. हा प्रसंग म्हणजे "दोन्हीकडच्या" कट्टरतावाद्यांना सणसणीत चपराक आहे. 

आता वळूया सरफरोशच्या प्रमुख खलनायकाकडे. वरकरणी सरफरोशचा प्रमुख खलनायक म्हणजे पाकिस्तान सरकार आणि त्यांचा मुख्य मोहरा गझल गायक गुलफाम हसन आहे. पण दोघांच्याही खलनायकीचे मूळ वेगवेगळे आहे. पाकिस्तान सरकार भारतात दहशतवाद पसरवण्याच्या बेतात आहे. पण गुलफाम हसन त्याचा वैयक्तिक बदला घेतोय.  पाकिस्तान सरकारच्या मदतीने त्याला  भारतीयांचा बदला घ्यायचाय. पण त्याच वेळी एक कलाकार म्हणून स्वतःची गरिमा, मानसन्मान त्याला तितकाच प्रिय आहे. जगासमोर मनस्वी  कलाकार म्हणून वावरणारा गुलफाम हसनचा दुसरा चेहरा अत्यंत क्रूर आहे. आणि त्याच्या क्रूरपणाची ओळख पडद्यवर तेवढ्याच परिणामकारकतेने दाखवली आहे.  त्याच्या रियाजात व्यत्यय आणणाऱ्या बकरीच्या पिल्लाचा कान तो ज्या निर्दयतेने उपटतो ते एखाद्या मानवी हत्याकांडाच्या प्रसंगापेक्षाही भयंकर आहे. फाळणीच्या वेळी त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर झालेल्या अत्याचाराला त्याने समस्त भारतीयांना परस्पर गुन्हेगार ठरवले आहे. शेवटी जेंव्हा गुलफाम त्याच्या दहशतवादी भूमिकेचं समर्थन देताना फाळणीचा संदर्भ देतो त्या प्रसंगाचं टेकिंग अफलातून आहे. त्याच्या लंगड्या समर्थनाला एसीपी राठोड तडक उत्तर देतो.
"गुलफाम हसन.. बटवारा हमारे लिये भी कोई खुशी का दिन नही था."
गुलफाम निरुत्तर होतो पण तरीही स्वतः ची भूमिका सोडत नाही.
तो म्हणतो," हमारे घाव बहोत गेहरे है..वो इतनी आसानी सें नही भरेंगे."
हा प्रसंग अखेरचा असला तरी कितीतरी प्रश्नांची मालिका सुरु करून जातो. ही अशी मानसिकता असल्यास दहशतवाद कधीतरी थांबेल का? दहशतवादाचं मूळ परिस्थितीत आहे की मानसिकतेत? परिस्थितीत असेल तर गुलफामवर जे अत्याचार लहानपणी झालेत त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आणि मानसन्मान त्याला परतफेडीच्या स्वरूपात मिळालंय. तर या परिस्थितीत गुलफाम हसन दहशतवादाकडे का झुकावा? बरं ज्या पाकिस्तानी सरकारसाठी गुलफाम काम करतोय त्यांच्या दृष्टीने तो केवळ एक मुहाजिर म्हणजे बाहेरचा व्यक्ती आहे. आणि ह्याचीही गुलफामला पूर्ण कल्पना आहे. तरीही तो त्यांच्याशी प्रामाणिक का आहे?

 सरफरोश वेगळा आहे तो ह्यासाठीच. कारण केवळ एक पोलीस केस न राहता सरफरोश समाजातल्या कितीतरी गोष्टींवर भाष्य करतो. अभिनयाच्या बाबतीतीही सरफरोश समकालीन चित्रपटांपेक्षा सरस आहे हे वेगळे सांगायला नकोच. मध्यंतरी सरफरोशचा सिक्वेल येणार असं वाचण्यात आलं. असं काहीही घडू नये अशी मनोमन इच्छा आहे. काही कलाकृतींना परत छेडू नये. कारण त्यांचे धागे प्रेक्षकांच्या मनाशी जुळलेले असतात.

सरफरोशचा सिक्वेल बनवण्यापेक्षा सरफरोश परत थेटरात लावा रे. एसीपी राठोडचा तो डायलॉग थेटरमध्ये ऐकायची फार इच्छा आहे.

"क्या ठाकूर..तेरेको कितनी बार बुलाया तू आता नही है!!!"

समाप्त
 










No comments:

Post a Comment