Thursday 1 February 2018

बजेट -- एवढं काय त्यात!!

आईची शप्पथ घेऊन सांगतो मला बजेट मधलं काहीही कळत नाही. पण आसपासचे लोकं "बजेट आहे,बजेट आहे" म्हणून अशी काही वातावरण निर्मिती करतात की मी उगाचच एक्ससाईट होऊन त्याची वाट बघायला लागतो. अर्थमंत्र्यांचं दोन- तीन तासांचं भाषण ऐकल्यावर "आपल्याला ह्यातलं काय कळलं?" असा प्रश्न एकांतात मी स्वत:ला नेहमीच विचारतो. आता हा प्रश्न क्षणिक असला तरी "आपल्याला नेमका काय फरक पडला?" हा प्रश्न तर वर्षभर सतावत असतो. बजेटमध्ये अमुक अमुक गोष्टीत स्वस्त झाल्या असं जाहीर करतात. त्या खरंच झाल्यात का हे बघायला मी मुद्दामहून कधीही बाजारात जात नाही. आधी आईने आणि आता बायकोने दिलेली सामानाची यादी बाजारात जाऊन निमूटपणे घेऊन येणे एवढंच आम्हाला माहिती. त्यात आजकाल तर आम्ही मॉल किंवा सुपरमार्केटमध्ये जातो. त्यामुळे सामानाचं बिल जरा जास्त वाटलं तर घेतलेल्या पन्नास टक्के तद्दन निरुपयोगी वस्तूंपैकी दोन-चार काढून ठेवायच्या. इतके सरळसाधे आमचे हिशोब असतात. तरीसुद्धा आम्ही बजेट बजेट करून का नाचत असतो हे माझं मलाच कळत नाहीये!

त्यातल्या त्यात इन्कम टॅक्सच्या मर्यादेत आल्यापासून बजेटच्या त्या भागातलं मला थोडंफार कळतं. सरकारची मेहेरबानी झाली तर वर्षाकाठी दोन-चार हजार रुपये वाचतात. वाचलेले हेच दोन-चार हजार रुपये सरकार इतर गोष्टींचे भाव वाढवून आमच्याकडून दुपटीने नकळतपणे वसूल करून घेते. मला आजवर उमगलेलं बजेट एवढंच आहे. पण मी काय म्हणतो,समजा सरकारने टॅक्स कमी केला आणि भाव वाढवले नाही.  तरी त्या दोन-चार हजारात आम्ही नेमके कोणते बंगले बांधणार आहोत?? पण इन्कम टॅक्स हा लोकांच्या इतक्या जिव्हाळ्याचा विषय आहे की, च्यायला सरकारने टॅक्स वाढवला नसता तर फेरारीचं बुक करणार होतो ह्या आवेशात लोकं बोलतात.

 बजेट म्हणजे सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक अशी सरळसाधी व्याख्या आहे. आता अंदाज म्हटलं की तो चुकणारच अशी समजूत करून लोकं गप्प का बसत नाहीत? नाहीतरी लोकसंख्येपासून ते हवामानापर्यंत कोणता सरकारी अंदाज बरोबर आलाय आजपर्यंत? बरं सरकार इतकं लाखो कोटींचं बजेट सादर करते. पुढल्या वर्षी त्यातले किती खर्च झाले हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही? (तुम्हाला सांगतो,लोकसभेच्या अध्यक्षपदी जर आमच्या गल्लीतला वाणी बसला असता तर त्याने अर्थमंत्र्यांना,"ओ आधी जुना हिशोब क्लियर करा..मग पुढचं बघू." असं ठणकावून सांगितलं असतं.) तसं पाहिलं तर हा प्रश्न आम्हाला महिन्याच्या घराच्या बजेटमध्ये सुद्धा पडत नाही. कारण मुळात तो प्रश्न पडण्याची गरजच पडत नाही. महिनाअखेर अकाउंटमधली शिल्लक रक्कम बघून आपलं बजेट पार बोंबललयं हे दिसूनच येतं. सरकारला फिस्कल डेफिसिट इकडून तिकडून कमी करण्याची सोय तरी असते. आम्हाला ती पण नाही. आमचं फिस्कटलेलं बजेट म्हणजेच आमचं फिस्कल डेफिसिट!!

काल रात्री असंच मी बजेट- बजेट म्हणून नाचत असताना बायकोने,"एवढं काय त्यात?" असं विचारून मला गप्प केलं. तिला एवढं काय हे समजावून सांगताना मला बजेटचा "ब" सुद्धा समजत नाही अशी माझी अंतरात्मा ओरडून ओरडून सांगत होती. तरीसुद्धा  मी जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ होऊ शकतो असा गैरसमज थोडावेळाकरिता निर्माण करण्यात मी यशस्वी झालो होतो. पण तेवढ्यात धोब्याकडून पैसे वापस घेताना  मी दहा रुपयाची फाटकी नोट घेऊन आलोय हे तिच्या लक्षात आलं. आणि माझ्यातल्या तज्ञाचा त्रिफळा उडाला.

आमचं एक जाऊद्या. (कारण आमचं नेहमीच जाऊ देण्या लायकचं असतं म्हणा!) पण मंत्रालयातले सगळे तज्ञ मिळून बजेट कसं तयार करत असतील हा प्रश्न मला नेहमी पडतो. म्हणजे बघा, अर्थमंत्री असे राजासारखे दरबारात उच्चासनावर बसले असतील. वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी डोळ्यात अत्यंत करुण भाव आणून हात जोडून राजाकडे पैसे मागत असतील. राजा आणि प्रधान आपल्याच तोऱ्यात," का रे रेलव्या, तुला कशाला पाहिजे पाच लाख कोटी? कश्याला नवीन रेलवे लाईन टाकायच्या? आहे त्या सांभाळ आधी..चाल हे घे दोन लाख कोटी..आणि तू रे परिवहन...चारशे कोटीच्या वरती एक रुपया मिळणार नाही सांगून ठेवतो. आणि त्या समाजकल्याणला द्या शंभर कोटी. तो रस्ते विकास बघा कसा लपून बसलाय कोपऱ्यात. xxच्या मागच्या वर्षी सत्तर हजार कोटी दिले तुला ते काय जावयाच्या गावात हायवे बांधण्यासाठी होय रे?? एक रुपया देणार नाही तुला आता. तुला किती पाहिजे रे संरक्षण? तुमचं काय बा तुम्ही मोठी माणसं. तुम्हाला ब्लँक चेकचं द्यावा लागतो. प्रधानजी ह्यांना मोकळं करा लौकर. अहो कृषिताई तुम्ही कशाला रडताय? तुमची वेगळी व्यवस्था आहे. हे बघा..तीन लाख कोटी ठेवलेत दुष्काळासाठी.. ओला की कोरडा ते तुमचं तुम्ही बघा...आणि तो बालविकास राहिला की हो.अहो मुलं म्हणजे आपल्या देशाचं भविष्य.द्या त्याला हजारेक कोटी. दोन-चार तरी बगीचे बांधा हो ह्याच्यात..आणि हो शिक्षणाचं काय तुमच्या? पाच हजार कोटी देतो अन सहा नवीन विद्यापीठं घोषित करुन टाकतो..चालेल का? ..अरेरे जलसंवर्धन करायचं राहिलं ना..आणि आदिवासी वगैरे..प्रधानजी उरलेले वाटून टाका बरं ह्यांच्यात. चला झाले का सगळे...करा हिशोब प्रधानजी अन मारा प्रिंटआउट..अन जरा दोन-चार चारोळ्या वगैरे टाका अधूनमधून ..लोकांना हसवायला बरं पडतं ते"

असो. बजेट जाहीर झालंय.आज बजेट सादर होण्यापूर्वीच हे मनोगत जगासमोर मांडावं असं वाटत होतं. पण नंतर विचार केला, आपली परिस्थिती ही बजेट सादर होण्याआधीही आणि नंतरही  तीच असणार आहे. मग नंतरच करू ना...एवढं काय त्यात!!

आज रात्रीचा विषय: सरकारने बजेटमध्ये काय काय करायला हवे होते..!  एवढं काय त्यात!!

 -- चिनार

1 comment: