Saturday 17 December 2016

मन्याची नोटबंदी !

नोव्हेंबरला पंतप्रधानांनी नोटबंदीची घोषणा केली. त्यावर बऱ्यावाईट प्रतिक्रिया येणं सुरु झालं.काळ्या पैशेवाल्यांचे चेहरे पांढरे पडले अन प्रामाणिक लोकांचे चेहरे खुलले. पण काळे नं पांढरे ह्यातल्या कश्याशीही संबंध नसलेला आमचा मन्या मात्र नोटबंदीच्या निर्णयानंतर परेशान झाला होता. आता अर्थातच हे आमच्या ध्यानात आलं नव्हतं. साहजिकच आहे म्हणा, नोटबंदी नंतरच्या गदारोळात मन्याची आठवण येणे शक्यंच नव्हते. पण त्यादिवशी बँकेच्या लायनीत उभा असताना, दूर झाडाखाली मन्या दिसला. मी त्याच्याजवळ गेलो.
"काय मन्या? इकडे कोणीकडे?"
"काही नाही रे", मन्या हताशपणे म्हणाला.
"काय झालंय तुला? काही टेन्शन आहे का?"
"काय सांगू रे, ह्या नोटबंदीने परेशान केलंय. काय करावं कळत नाही"
आता नोटबंदीने, पैश्याची चणचण सगळ्यांनाच आहे हे खरं असलं तरी मन्याची अडचण काहीतरी वेगळी आहे असं जाणवत होतं. कारण पैसे काढण्यासाठी तो लायनीत उभा नव्हता तर तो बॅंकेजवळ उभा होता. मन्याला मी खूप वर्षांपासून ओळखतो. अतिसामान्य परिस्थितीत वाढलेला मन्या आत्ता आत्ता कुठे सामान्य परिस्थितीपर्यंत पोहोचला होता.मुलखाचा इमानदार असल्यामुळे काळा पैसे वगैरे भानगड नव्हतीच. मन्या वीजमंडळात कारकून होता. वरकरणी ही नोकरी 'वरच्या कमाईवाली' वाटत असली तरी मन्या असलं काही करत नव्हता. मुळात त्याच्याकडे बघून, तो कधी लाच मागेल आणि मागितलीच तर त्याला कोणी देईल असंही वाटणार नाही. याउलट कामाला उशीर झाला तर ग्राहकाच्या संतापाला घाबरून मन्याचं नुकसान भरपाई देण्याची शक्यता जास्त आहे. कधीकाळी एक तारखेला मिळणारे पगाराचे पैसे ही मन्याने हाताळलेली सगळ्यात मोठी रोख असायची. ते ही पगार घरी आणून बायकोच्या हातात देईपर्यंतच. आताशा पगार बँकेत जमा होत असल्यामुळे मन्याला ते ही टेन्शन नव्हतं. बाकी ATM वगैरे भानगड मन्याची बायकोच सांभाळायची. म्हणजे महिन्यातल्या कुठल्याही दिवशी आणि दिवसाच्या कुठल्याही वेळी मन्याच्या खिश्यात शंभरपेक्षा जास्त रुपये मिळाले तर शप्पथ! हे असं असताना, नोटबंदीच्या निर्णयाचा मन्याशी काय संबंध हे कळत नव्हतं.
"नेमकं झालंय काय मन्या ?"
"अरे काय सांगू? खूप अडचणी आहेत माझ्यासमोर."
"कसल्या अडचणी?"
"अरे मोदींनी सांगितलंय, घरातल्या जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा बँकेत जमा करा किंवा बदलून घ्या”
"मग कर ना जमा. त्यात काय एवढं?"
"असतील तर करणार ना ?? घरातली कॅश मोजली मी आठ तारखेलाच रात्री. सातशे त्रेपन्न रुपये होते. त्यात एकही पाचशेची नोट नव्हती. काय भरू आता बँकेत?"
"मग चांगलंय ना. काहीच अडचण नाही आता"
"तुला काय होतंय बोलायला? बँकेत पैसे जमा करणाऱ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड मागतायेत बँकवाले."
"मग?"
"आता माझं आधार कार्ड नाही मिळणार ना त्यांना."
"त्याने तुला काय फरक पडतो?"
"अरे, कसं कळत नाही तुला? मी मनोहर भास्कर तळपदे बँकेत पैशे जमा करायला आलोच नाही हे कळल्यावर डाऊट येणार ना त्यांना. माझ्या घरी धाड पडणार आता."
अरे रे रे रे रे रे रे...कोणाचं काय तं कोणाचं काय रे देवा !!
मी मन्याला भेटायला सोडून आलेली लाईन आता मारुतीच्या शेपटासारखी लांब पसरली होती. आणि इथे मन्याची ही अडचण ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं.
"मन्या मी निघतो. आपण नंतर भेटू."
"कुठे निघालास? माझी मदत कोण करणार आता? घरात धाड पडल्यावर येणार का तू?"
माझ्या डोळ्यासमोर मन्याचं छोटेखानी घर आलं. दरवाजातल्या पायपुसण्यापासून परसातल्या कुंडीपर्यन्त सगळ्या गोष्टी हिशोबात धरल्या तरी त्याचं व्हॅल्युएशन दोन लाखाच्यावर जाणार नाही. मन्या आणि कुटुंब एकंदरीतच काटकसरी पण नीटनेटके होते. आता ह्याच्या घरी धाड घातल्यावर एखादा आयकर अधिकारी पश्चातापाने राजीनामा देईल.
"बरं मग तू आत्ता बँकेत का आला आहेस ? तुझ्याकडे तर पाचशे-हजाराची एकही नोट नाही."
"मी विचार केला, बँकेतच जाऊन चौकशी करावी काय करता येईल म्हणून."
एवढ्या गर्दीने आधीच वैतागलेला बँकेचा कर्मचारी मन्याच्या प्रश्नाला कसा रियाक्ट होईल ह्याचा मी विचार करू लागलो. तसे बँकेत येणाऱ्या लोकांचे प्रश्नही विनोदी असतातच. एकाने माझ्यासमोर विचारलं होतं,"ह्या दोन हजाराच्या नोटेचा रंग गेला तर बदलून मिळेल का?"!!
शेवटी मी मन्याला म्हटलं," असं करू, माझ्याजवळ पाचशेच्या नोटा आहेत. त्यातली एक तू घे आणि बँकेत जमा करून टाक. तुझ्याजवळची चिल्लर मला देऊन टाक हवंतर."
हे ऐकून मन्याचा चेहरा एकदमच उजळला. मन्याच्या आयुष्यातला मोठा प्रश्न मी सोडवला होता.मुळात मन्याला प्रश्न फार कमी पडायचे. आहे ते स्वीकारायची मानसिकता असल्यामुळे  कुठल्याही अडचणीला तो सामोरा जायचा. ह्यापूर्वी सद्दाम हुसेनला फाशी झाली त्यादिवशी मन्या चिंताग्रस्त झाला होता. पण त्याच्या चिंतेचं कारण वैश्विक अशांतता हे नव्हतं. आता इराकने चिडून जगाचा तेलपुरवठाच बंद केला तर आपल्या स्कुटरमध्ये पेट्रोल कुठून भरायचं हे त्याला काळात नव्हतं. असो.
"तू पाच मिनिट थांब, मी आधार कार्डची झेरॉक्स घेऊन येतो.", मन्या आंनदाने म्हणाला.
"अरे आधार कार्ड नाही लागत पाचशे रुपयांसाठी. तुझ्या नावाने पैसे जमा झाल्याची नोंद होणं आवश्यक आहे फक्त."
मी आणि मन्या लायनीत लागलो. दोन तासानंतर आमचा नंबर आला.

पाचशे रुपये बँकेत जमा करून मन्या समाधानी मनाने घरी गेला !!


3 comments:

  1. Kahi ankhi manya: madam morning me do hazaar ka exchange karke gaya. Ye gulabi Patti rakho apne paas, koi chutta hi nahi deta. Abhi iska exchange de do.

    ReplyDelete